पुणे- शहरातील वारसा स्थळांमध्ये ऐतिहासिक वाडे, पर्यटन स्थळे अशा 250 हून अधिक वास्तू आहे. या ठिकाणी प्रामुख्याने स्वच्छता, सुविधा, स्वच्छतागृह आदीबाबतच्या अडचणी दूर व्हायला हव्यात. वारसा स्थळांबाबत अनेक अडचणी आहेत.
मात्र, त्यावर केवळ चर्चा करण्यापेक्षा आपण पुणेकर म्हणून काय करू शकतो, याविषयी आखणी करणे गरजेचे आहे. वारसा स्थळांचे जतन आणि संवर्धन करण्यासाठी लोकसहभाग देखील गरजेचा असल्याचे मत “हेरिटेज’ क्षेत्रातील अभ्यासकांनी व्यक्त केले.
जागतिक वारसा दिनानिमित्त “सेव्ह हेरिटेज’ या चळवळी अंतर्गत “वारसा जागर’ या चर्चासत्राचे आयोजन केले होते. यावेळी ज्येष्ठ अभ्यासक प्र.के.घाणेकर, सुधन्वा रानडे, शाम ढवळे, शाहीर हेमंत मावळे, डॉ. श्रीकांत गबाले, आयोजक स्वप्नील नहार, मंजिरी भालेराव, आनंद कानिटकर आदी उपस्थित आहे.
विश्रामबागवाडा, नानावाडा आदी ऐतिहासिक वास्तूंमध्ये उपक्रम राबविले जात होते. मात्र ते आजमितीस बंद आहेत. त्यामुळे ते पुन्हा चालू करून वारसा स्थळे अधिक समृद्ध करण्याकरिता एक आराखडा देखील आखण्याचा निर्धार चर्चासत्रात करण्यात आला. यासह अनेक वाडे आजही उत्तम अवस्थेत असून, ते जगभरात पोहोचविण्यासाठी “व्हर्च्युअल’ माध्यमांचा वापर करण्याबाबत यावेळी चर्चा झाली.
प्रशिक्षित मार्गदर्शकांची आवश्यकता
पुण्यातील वारसास्थळांना मोठा इतिहास आहे. मात्र, तेथील मार्गदर्शकांकडे अपुरी माहिती आहे. वारसा स्थळांची माहिती देणाऱ्यांनी योग्य आणि अचूक माहिती पर्यटकांपर्यंत पोहोचवणे गरजेचे असते. त्यामुळे शहरातील वाडे, वास्तुंसंदर्भात माहिती आणि मार्गदर्शकांचे काम याबाबत प्रशिक्षणदेखील आवश्यक असून, याबाबतचा कोर्सदेखील सुरू व्हावा, अशी मागणी यावेळी करण्यात आली.