पुणे – रामायणातील प्रसंगांच्या सर्जनशील आणि स्वयंभू निवडक कल्पनाचित्रांचे प्रदर्शन दि. २० ते २१ जानेवारी सकाळी ११ ते रात्री १० या वेळेत शनिवार पेठेतील न्यू इंग्लिश स्कूल रमणबाग प्रशालेत आयोजित करण्यात आले आहे. ही माहिती आर्ट इंडिया फाऊंडेशनच्या संचालिका डॉ. प्राची साठे यांनी दिली.
अयोध्येतील राममंदिराचे भूमिपूजन दि. ५ ऑगस्ट २०२० रोजी झाले होते. त्या निमित्ताने आर्ट इंडिया फाउंडेशनचे संस्थापक मिलिंद साठे यांच्या संकल्पनेतून खुला आसमान या उपक्रमाअंतर्गत या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. करोना प्रादुर्भावाच्या काळातही या स्पर्धेला उत्तम प्रतिसाद मिळाला होता. पंधरा राष्ट्रांतील १,८२० शालेय-महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी ऑनलाइन माध्यमातून स्पर्धेत सहभाग घेतला. त्यातून २८९ चित्रे पारितोषिकपात्र ठरली. भौगोलिक क्षेत्र, वयोगट आणि शैलीच्या आधारे निवडक १२१ चित्रांचे पुस्तक तयार करण्यात आले आहे.
रामायणातील रामाचा जन्म, बालपण, विश्वामित्रांच्या आश्रमातील भावंडांसमवेत शिक्षण, सिता स्वयंवर, वनवासातील काळ, शूर्पणखेचे गर्वहरण, सुग्रीव, बाली यांची साथ, हनुमानाची भक्ती, सीता-हनुमान यांची अशोकवनातील भेट, बिभिषणाची भेट, कुंभकर्णाशी लढाई, रावण वध आणि अयोध्येतील स्वागत असे विविध प्रसंग चित्रबद्ध करण्यात आले आहेत.
“खुला आसमान या उपक्रमांतर्गत मुलांना स्वतंत्रपणे चित्र काढणे किंवा रंगविण्यासाठी प्रोत्साहित करण्यात आले. मुलांच्या भावना रेषा, आकार आणि रंगाांद्वारे उत्स्फूर्तपणे व्यक्त झाल्या आहेत. ऐकलेले, वाचलेले किंवा समजलेले रामायण दृष्य करण्याचा प्रयत्न वाखाणण्याजोगा आहे. अयोध्येत रामललाच्या मूर्तीची प्रतिष्ठापना होत असताना आयोजित करण्यात आलेले हे प्रदर्शन आबालवृद्धांना नक्की आवडेल.” – वासुदेव कामत, ज्येष्ठ चित्रकार