पुणे –संपात सहभागी एसटी कर्मचाऱ्यांच्या हालचालींवर नजर ठेवण्याच्या सूचना पोलिसांना देण्यात आल्या आहेत. त्यामुळे राज्य सरकार पोलीस यंत्रणेचा वापर करत संप चिरडण्याचे कारस्थान आखत असल्याचा आरोप भारतीय जनता पक्षाचे शहराध्यक्ष जगदीश मुळीक यांनी केला. तसेच, सरकारचे कुटिल कारस्थान हाणून पाडण्यासाठी भाजपतर्फे राज्यभर व्यापक जागृती मोहीम राबविणार असल्याचेही मुळीक यांनी सांगितले.
मुळीक म्हणाले, तब्बल साडेचार महिने सुरू असलेल्या एसटी कामगारांच्या संपातून तोडगा काढून महामंडळाचा घसरलेला गाडा मार्गावर आणण्यासाठी सरकारकडून कोणतेच प्रयत्न केले जात नाहीये. याउलट संपकरी कर्मचाऱ्यांवर दडपशाही, कारवाईची टांगती तलवार, कायद्याचा बडगा उगारण्याचे इशारे दिले जात असून, आता तर संपकऱ्यांच्या हालचालींवर नजर ठेवण्याच्या सूचना पोलिसांना देण्यात आल्या आहेत. पोलिसी बळाचा वापर करून कायदा सुव्यवस्थेचे कारण देत संप चिरडण्याचे कारस्थान आखले जात असल्याची भीती संपकऱ्यांमध्ये पसरली आहे. सरकारने वेळीच संप मिटविण्यासाठी सकारात्मक पावले उचलावीत आणि लाल परीला पुन्हा जीवदान द्यावे, अशी मागणीही मुळीक यांनी केली.