पुणे : चेन्नईहून पुण्याकडे येत असलेल्या भारत गौरव रेल्वेगाडीमध्ये प्रवाशांना विषबाधा झाली असल्याचे वृत्त समोर आले आहे. या प्रवाशांच्या औषधोपचारासाठी पुणे रेल्वे स्टेशनवर तातडीने व्यवस्था करण्यात आली आहे. तसेच ससून रुग्णालयात प्रवाशांच्या उपचारासाठी व्यवस्था करण्याच्या सुचना देण्यात आल्या आहेत. जवळपास ४० प्रवाशांना विषबाधा झाल्याची माहिती मिळत आहे.
भारत गौरव यात्रा रेल्वे चेन्नईहून पुण्याकडे येत होती. रेल्वे गाड्यांमधील पॅन्ट्री सेवा बंद केली असली तरी या विशेष गाडीमध्ये खानपान सुविधा देण्यात आली आहे. मध्यरात्रीच्या सुमारास ही विशेष रेल्वे गाडी पुणे रेल्वे स्टेशनला आली. प्लॅटफॉर्मवरच विषबाधा झालेल्यांवर प्राथमिक उपचार करण्यास सुरुवात करण्यात आली. त्यानंतर त्यांना ससून रुग्णालयात हलवण्यात येत असून, ससून रुग्णालय प्रशासनाला ४० बेड तयार ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
रेल्वे मंत्रालयाने आता गाड्यांमध्ये पेन्ट्री कार ठेवली नाही. भारत गौरव यात्रा ही रेल्वे चेन्नईहून पुणे शहराकडे येत होती. गाडीत पेन्ट्री कार नसल्यामुळे खानपान सुविधा नाही. यामुळे प्रवाशांना ताजे अन्न मिळत नाही. वेडरकडून अनेक वेळा सकाळचे फुड रात्री दिले जाते. त्यामुळे ही विषबाधा झाल्याची शक्यता आहे.