पुणे, खडकवासला धरणसाखळीत मागील वर्षीच्या तुलनेत दोन टीएमसी कमी पाणीसाठा आहे. त्यातच, २३ गावांना पाणीपुरवठा करण्याची जबाबदारी महापालिकेची असल्याने या गावांना तातडीने टँकरद्वारे पाणी देण्याचे आदेश उच्च न्यायालयाने दिले आहेत. त्यामुळे कोंडीत सापडलेले महापालिका प्रशासन शहरात ‘नवीन नळजोड” महिनाभर न देण्याचा निर्णय घेण्याच्या तयारीत आहे.
जून मधील पावसाची आणि धरणातील पाण्याची स्थिती लक्षात घेऊन पुढील आदेश दिला जाईल, अशा सूचनाही पाणीपुरवठा विभागाने सर्व •जलकेंद्राच्या प्रमुखांना दिल्या आहेत. गेल्या काही वर्षात शहरात उन्हाळ्यात मोठ्या प्रमाणात पाणीटंचाई भासत असल्याने तसेच महापालिकेस पाणी पुरवठ्याच्या नियोजनात अपयश येत असल्याने ही स्थिती महापालिकेच्या इतिहासात पहिल्यांदाच ओढावली असल्याचे सांगण्यात येत आहे.
उन्हाळ्यात शहराचा पारा ४१च्या वर गेला आहे. यातून शहरात पाण्याची मागणी तब्बल ३० टक्के वाढली आहे. दरवर्षी ही मागणी १५ ते २० टक्के वाढते. महापालिकेकडून खडकवासला धरणातून दिवसाला १२५० ते १३०० एमएलडी पाणी घेतले जात होते. मात्र, हे पाणी आता दिवसाला १६०० ते १७०० एमएलडी घेण्यात येत असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले. महापालिका हद्दीत नव्याने समाविष्ट गावांमध्ये पाणीपुरवठा योजना असल्या तरी त्यांना साधे पाणी महापालिका देत होती. आता या गावांना शुद्ध पाणी द्यावे लागत आहे. टँकरनेही पाणी देण्याचे आदेश उच्च न्यायालयाचे आहेत. यामुळे शहराच्या जुन्या हद्दीत महिन्याला टँकरच्या फेऱ्यांची संख्या ३० हजारांच्यावर गेली असताना त्यामध्ये गावांची भर पडली आहे.
गतवर्षीपेक्षा २ टीएमसी कमी पाणी
खडकवासला धरणसाखळीत मागील वर्षाच्या तुलनेत दोन टीएमसी कमी पाणी आहे. मागील वर्षी याच कालावधीत ११ टीएमसी पाणी होते ते या वर्षी ९ टीएमसी आहे. गेल्या काही वर्षात धरणांच्या पाणलोट क्षेत्रात जुलैनंतर पाऊस हजेरी लावतो. त्यामुळे धरणातील पाणीसाठा ग्रामीण आणि शहरी भागासाठी राखीव ठेवावा लागतो. त्याचा परिणाम यंदा जाणवणार असून पाटबंधारे विभागाकडून गेल्या सहा महिन्यांपासून महापालिकेस वारंवार उन्हाळ्यातील पाणी संकटाबाबत कळविले जात होते. मात्र, केवळ समान पाणी योजनेच्या कामावर लक्ष केंद्रित करणाऱ्या प्रशासनाकडून पाणी नियोजनाकडे दुर्लक्ष केले गेल्याने नागरिकांना आणि व्यावसायिकांना आता नळजोडांसाठी प्रतीक्षा करावी लागणार आहे.