पुणे –महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना ते दोघे एकमेकांच्या प्रेमात पडले. यातून त्यांना मुलगी झाली. घरच्यांचा विरोध होईल या भीतीपोटी त्यांनी मुलीला जन्म दिला, पण मित्राकडे सोपवले. त्यानंतर या चिमुकलीचे अपहरण झाले. तेथून सुटका झाल्यानंतर ती एका संस्थेच्या ताब्यात गेली. त्यानंतर आईने एक वर्षांहून अधिक काळ न्यायालयीन लढा दिला. अन् अपहरणानंतर संस्थेच्या ताब्यात गेलेली ती अखेर आईच्या कुशीत विसावली.
माधव व माधवी (नाव बदलेली आहे) असे या दाम्पत्याचे नाव आहे. माधवीने 17 ऑक्टोबर 2020 रोजी चाकण येथील रुग्णालयात चिमुकलीला जन्म दिला. त्यांनी ते बाळ मूलबाळ नसलेल्या मित्राकडे सोपवले. मुलगी काही दिवस सांभाळल्यानंतर पुन्हा परत देण्याचे आश्वासन संबंधित दाम्पत्याने माधव व माधवीला दिले. यादरम्यान, एके दिवशी त्या चिमुकलीचे अपहरण झाले. ही घटना कळताच माधव आणि माधवीच्या पायाखालची वाळू सरकली. त्यांनी पोलिसांकडे धाव घेतली. पण, जणू दैव सोबत होते, की काय…काही कालावधीनंतर अपहरण करणाऱ्या महिलेला पोलिसांनी अटक केली. त्यानंतर पोलिसांनी मुलीचा ताबा आळंदी रस्ता वडमुखवाडी-चऱ्होली येथील रेणुका शिशूगृहाकडे देण्यात आला. दरम्यान मुलगी शिशूगृहात असल्याचे कळाल्यानंतर माधव व माधवी यांनी मुलीच्या ताब्यासाठी बालकल्याण समितीकडे अर्ज केला. मात्र, न्यायालयीन प्रक्रियेशिवाय ताबा देण्यास संस्थेने नकार दिला. त्यानंतर माधवीने ऍड. सोपान पाटील व ऍड. मनीष ननावरे यामार्फत न्यायालयात अर्ज केला.