संगमनेर – संगमनेर बाजार समितीमध्ये कांदा लिलाव सुरू झाला होता. पण, पुन्हा एकदा शेतकऱ्यांकडून लिलाव बंद पाडण्यात आला. कांद्याला योग्य भाव मिळत नसल्याने शेतकरी नाराज आहेत. त्यामुळे शेतकरी आक्रमक होत त्यांनी कांदा लिलाव बंद पाडला. बाजार समितीच्या बाहेर संतप्त शेतकऱ्यांनी रस्ता रोको आंदोलन सुरू केले. तब्बल दोन तास सुरू असलेले आंदोलन सभापती शंकरराव खेमनर व सचिव सतीश गुंजाळ यांनी कांद्याच्या लिलावाचा फेरलिलाव करणार असल्याची घोषणा केल्यानंतर मागे घेण्यात आले.
संगमनेर तालुक्यातील अनेक गावांतून शेतकरी आपला कांदा घेऊन संगमनेर बाजार समितीमध्ये आले होते. सकाळपासून आलेल्या शेतकऱ्यांना कांद्याला भाव मिळण्याची अपेक्षा होती. पण, त्यांना म्हणावा तसा भाव मिळालेला नाही. नाफेडच्या दरानुसार देखील भाव मिळत नसल्याचं शेतकऱ्यांचं म्हणणं आहे. शेतकऱ्यांनी आज मोठ्या आशेने बाजार गाठला होता. पण, त्यांच्या पदरी निराशा पडल्याची चर्चा आहे. संतप्त शेतकऱ्यांनी लासलगाव आणि पिंपळगाव येथील बाजारपेठातील कांदा लिलाव बंद पाडला आहे.
तालुक्यातील शेतकऱ्यांनी संतप्त होत बाजार समितीच्या आवारात ठिय्या देत “कांद्याला योग्य भाव द्यावा”, “सरकारचा निषेध असो”, आशा घोषणा देत शहरातून गेलेला पुणे – नाशिक महामार्ग अडवण्यात आला होता. यावेळी या मार्गावर दुतर्फा मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली होती. सभापती शंकरराव खेमनर व सचिव सतीश गुंजाळ यांनी सकाळपासून झालेल्या कांद्याच्या लिलावाचा फेरलिलाव करणार असल्याची घोषणा केल्यानंतर शेतकऱ्यांनी आंदोलन मागे घेतले.
कांदा लिलावाच्या दिवशी बाजार समितीचे समोर आंदोलन झाले. या आंदोलनामुळे नाशिक – पुणे महामार्गाच्या दोन्ही बाजूला वाहनांच्या तीन तास रांगा लागल्या होत्या. आंदोलनाची माहिती मिळताच संगमनेर शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक भगवान मथुरे, तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक देविदास ढुमणे हे पोलीस आंदोलनस्थळी दाखल झाले होते. त्यांनी आंदोलकांना समजावून खोळंबलेली वाहतूक सुरळीत केली. फेर लिलाव होणार असल्याने आंदोलन मागे घेण्यात आले.
महसूलमंत्री यांना फोनद्वारे या आंदोलनाची माहिती देण्यात आली. मात्र, ते म्हणाले की, कांद्याला भाव न मिळणे हा शेतकऱ्यांवर अन्याय आहे. मात्र मी कृषीमंत्री नाही. ५५०० रुपयांनी विकणारा कांदा आज २५०० रुपयेपर्यंत आलाय. निर्यात बंद केली असले तरी त्या धोरणाला अजून पंधरा दिवस बाकी आहेत.
– संतप्त शेतकरी