मुंढवा – पुणे महापालिकेत केशवनगरचा समावेश सात वर्षांपूर्वी झाला असला तरी येथील मूलभूत समस्या सोडविण्यात पालिका प्रशासन आणि नगरसेवक अपयशी ठरले आहेत. त्यात गेल्या दोन वर्षांपासून पालिकेवर प्रशासकीय राज असल्याने या भागातील साधी-किरकोळ कामेही होत नसल्याने ग्रामपंचायतच बरी होती की.., अशी थेट प्रतिक्रिया पालिकेच्या अधिकाऱ्यांसमोरच नागरिक व्यक्त करीत आहेत.
केशवनगर येथील ओढ्यावरील पुलावर कचरा व पावसाचे पाणी साचले आहे. पुलावर फुटपाथ नसल्याने नागरिकांना साचलेल्या पाण्यातूनच जावे लागत आहे. ग्रामपंचायत असताना सर्वकामे स्थानिक पातळीवर होत होती. सरपंच, उपसरपंच आणि सदस्यांकडे तक्रार केली की काम होत होते. आता, नगरसेवक पदाची मूदत दीड वर्षांपूर्वीच संपली आहे. काही जण कुठलेही काम आता करीत नाहीत. काही माजी नगरसेवक जमेल तसा पाठपुरावा करतात.
त्यामुळे नागरिक क्षेत्रीय कार्यालयासह अगदी थेट पालिकेत जाऊन संबंधीत विभागातील अधिकाऱ्यांना काम सांगत आहेत. परंतु, करू.., बघू अशी उत्तरे मिळत असल्याने केशवनगरला विविध समस्यांनी ग्रासले आहे. केशवनगर भागातील कुंभारवाडा, बुद्ध विहार, ऑक्सफर्ड रिव्हर्स ह्यु, गुरुकृपा सोसायटी व ऑरबिस शाळा रस्ता, शंकरनगर, महागणेशनगरी सोसायटी जवळ, शिक्षक सोसायटी आदी परिसरातील कचरा वेळेत उचलला जात नसल्याने दुर्गंधी सुटत आहे.
मच्छर, माशांचा त्रास…
केशवनगर परिसरात अनेक ठिकाणी उघड्यावर कचरा पडत असल्याने यातून दुर्गंधीसह मच्छर, माशा, किटकांचा त्रास वाढला आहे. अस्वच्छतेतून डेंग्यू, मलेरिया अशा आजारांची साथ पसरण्याचा धोका आहे. गेल्या महिन्यांत परिसरात असे काही रुग्ण आढळून आल्याने पालिका प्रशासनाने केशवनगरमधील कचरा समस्या सोडविणे गरजेचे आहे. दररोज कचरा उचलावा, अशी माफक अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त करण्यात आली आहे.