प्रभात वृतसेवा पुणे, दि. 13 -खडकवासला धरणातून सोडण्यात येणाऱ्या पाण्यामुळे शहराच्या मध्यवर्ती भागात असलेला बाबा भिडे पूल पाण्याखाली गेला आहे. मात्र, हा पूल पाण्याखाली जाणार असल्याची कल्पना असतानाही महापालिकेच्या अपत्ती व्यवस्थापन विभागाकडून पूलाकडे जाणारी वाहतूक बंद करण्यासाठी अथवा नदीपात्रातील रस्त्यावर लावलेली वाहने बाहेर काढण्यासाठी या वर्षी काहीच उपाय योजना केल्या नसल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
पहिल्या दिवशी पाणी सोडण्यात आले, तेव्हा रक्षाबंधनची महापालिकेला सुट्टी होती. त्यानंतर दुसऱ्या दिवशी महापालिकेत अग्निशमनदलाची रॅली असल्याने अधिकारी त्यात व्यस्त होते तर शनिवारी शासकीय सुट्टी असल्याने कोणालाही याचे गांभीर्य नव्हते. त्यामुळे पोलीसही वेळ मिळेल तसे याकडे लक्ष देत असल्याचे चित्र आहे.
सगळा विस्कळीत कारभार
खडकवासला, पानशेत, वरसगाव ही चारहे धरणे जवळपास 100 टक्के भरली आहेत. त्यामुळे, यंदाच्या हंगामात पहिल्यांदाच गुरूवारी (दि.11) खडकवासला धरणातून सर्वाधिक 26 हजार क्यूसेक पाण्याचा विसर्ग करण्यात आला. हा पाण्याच्या विसर्ग सकाळपासून सुरू करण्यात आला होता तर पावसाचा जोर अधिक असल्याने दुपारनंतर मोठ्या प्रमाणात पाणी सोडले जाईल, अशी शक्यता होती. त्याचा अंदाजही पाटबंधारे विभागाने पालिकेस कळविला होता. तर सुट्टीचा दिवस असल्याने अनेक पुणेकर शहरात खरेदीसाठी आले होते.
नदीपात्रात वाहने पार्क करून हे नागरिक खरेदीसाठी आसपासच्या परिसरात गेले होते. मात्र, शासकीय सुट्टी असल्याने पालिकेचा आपत्ती व्यवस्थापन विभागही रजेवर असल्याचे चित्र होते. वास्तविक पाहता सकाळीच पाणी सोडण्याचा “अलर्ट’ असल्याने या रस्त्यावर वाहने पार्क करण्यास पालिकेने मनाई करणे आवश्यक होते. तसेच पाणी सोडण्यास सुरूवात करताच भिडे पूलाकडे आणि नदीपात्रात जाणारे रस्ते बंद करणे अपेक्षित होते. मात्र, नेहमीप्रमाणे पूल पाण्याखाली जाण्याची वाट पाहण्यात आली. परिणामी, रस्ते सुरू आहेत असा समज करून घेत अनेकांनी वाहने नदीपात्रातच ठेवली. नंतर अचानक रस्ते बंद झाल्याने मध्यवर्ती पेठा तसेच आसपासच्या रस्त्यांवर वाहतूक कोंडीचा सामना करावा लागला.
यंत्रणांमध्ये समन्वयच नाही
पालिकेने तयार केलेल्या आपत्ती व्यवस्थापन आराखड्यात केवळ गोड-गोड शब्द टाकून पाटबंधारे, पोलीस, जिल्हा प्रशासन, अग्निशमन दलात समन्वय असल्याचे कागदी घोडे नाचविण्यात आले आहेत. मात्र, भिडे पूल बंद करण्यासाठी केवळ पोलीसच येत असल्याचे वास्तव आहे, ते पूल पाण्याखाली गेल्यानंतर रस्ते बंद करण्याची भूमिका घेत असल्याचे चित्र आहे. प्रत्यक्षात नदीकडे जाणारे रस्ते बंद केल्यानंतर त्या ठिकाणी सुरक्षेसाठी महापालिका आणि पोलिसांनी रात्रीही कर्मचारी तैनात करणे आवश्यक आहे.
गुरूवारी रात्री रस्ते बंद केलेले असतानाही केवळ त्या ठिकाणी कोणीही अडविण्यास नसल्याने एक कुटूंब कार घेऊन नदीपात्रातल्या रस्त्याला गेले, नंतर पुरात अडकल्याचे लक्षात आल्यानंतर सर्व यंत्रणांची धावपळ केली. मात्र, आधीच बंद केलेल्या रस्त्यावर कर्मचारी तैनात असते तर ही वेळच प्रशासनावरच आली नसती. त्यापेक्षा धक्कादायक बाब म्हणजे, शहरात 25 हजार क्यूसेकने पाणी सोडल्यास काही भागात पूरस्थिती उद्भवण्याची शक्यता असते, अशा भागात आपत्ती व्यवस्थापन विभाग व अग्निशमन दलाची वाहने जाऊन नागरिकांना इशारा देतात. मात्र, या वर्षी एकाही भागत इशारा देण्याची तसदी पालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाने घेतली नाही.