थेट जनतेतून “कारभारी’ निवडणार
राजगुरूनगर – जिल्ह्यात 63 ग्रामपंचायतींची रणधुमाळी सुरू होणार आहे. यात जुन्नर तालुक्यातील 38, आंबेगाव तालुक्यातील 18, खेड तालुक्यातील 5 आणि भोर तालुक्यातील 2 अशा एकूण 63 गावांमध्ये निवडणुकीचा धुराळा उडणार आहे. परिणामी गावगाड्याच्या अर्थकारणाला मोठा हातभार लागणार आहे. निवडणूक जाहीर होताच पक्षीय तसेच स्थानिक पातळीवर मोर्चेबांधणीला सुरुवात झाली आहे.
या निवडणुकीसाठी 18 सप्टेंबरला मतदान पार पडेल. राज्यात महाविकास आघाडीचे सरकार कोसळल्यानंतर सरपंचपदाची निवड ही थेट जनतेतून करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. याशिवाय ओबीसींना राजकीय आरक्षण देखील लागू असणार आहे. त्यामुळे या निवडणुकीकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष असणार आहे.
चारही तालुक्यातील गावांच्या निवडणुका भाऊबंदकी व वाड्यांमध्ये रंगतात. शिवाय एकाच पक्षाचे दोन गट आमने सामने उभे ठाकतात. निवडणूक प्रतिष्ठेची असल्याने लाखो रुपयांची उधळण होते. या वर्षी पाण्याच्या उपलब्धतेमुळे खरीप हंगाम जोमात येण्याची आशा आहे. त्यामुळे मजुर मतदार राजाचादेखील भाव वधारणार आहे. ग्रामीण भागातील चहा दुकाने, हॉटेल, उपहारगृहांना झळाळी मिळू शकेल. अखेरच्या टप्प्यातील आर्थिक उलाढालीही लक्षवेधी असतील. एकूणच ग्रामपंचायत निवडणूक ग्रामीण भागातील अर्थकारणाला चालना देणारी ठरणार आहे.
जानेवारी 21 ते सप्टेंबर 22 या कालावधीत मुदत संपणाऱ्या तसेच नव्याने स्थापित झालेल्या 38 ग्रामपंचायतीं असून या ग्रामपंचायतीची प्रभाग रचना, आरक्षण जाहीर झाले असून मतदार याद्या प्रसिद्ध झाल्या आहेत. सर्वोच्च न्यायालयाच्या 17 मे 2022 रोजीच्या आदेशानुसार हा कार्यक्रम तयार करण्यात आला आहे. निवडणूक काळात या भागात जर अतिवृष्टी किंवा पूरस्थिती झाली तर याबाबत जिल्हाधिकाऱ्यांनी तत्काळ अहवाल सादर करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
जुन्नरमध्ये ग्रामपंचायती आदिवासी भागातील
जुन्नर – जुन्नर तालुक्यातील 38 ग्रामपंचायतींच्या निवडणुका कार्यक्रम जाहीर झाला असल्याने या गावांतील गावकी, भावकीमध्ये राजकीय लढाई रंगणार आहे. तर सरपंच थेट जनतेतून निवडले जाणार असल्याने राजकीय धुळवड उडणार आहे. दरम्यान, निवडणुका होणाऱ्या बहुतेक ग्रामपंचायती आदिवासी भागातील आहेत.
या गावांमध्ये उडणार धुराळा; मढ, खुबी, कोपरे, तळेरान, सितेवाडी, घाटघर, अजनावळे, जळवंडी, उंडेखडक, राजुर, पूर, अंबोली, आपटाळे, खानगाव, घंगाळदरे, तांबे, मांडवे, पिंपळगावजोगा, पारगाव तर्फे मढ, देवळे, हडसर, गोद्रे,उच्छिल, तेजुर, इंगळून, भिवाडे बुद्रुक, सोनावळे, सुराळे, कोल्हेवाडी, चिल्हेवाडी, माणिकडोह, काळवाडी, दातखिळेवाडी, उंब्रज नंबर 2, येणेरे, विठ्ठलवाडी, मंगरूळ, झापवाडी. यात नव्याने स्थापित झालेल्या झाप व विठ्ठलवाडी दोन ग्रामपंचायती आहेत.