सातारा -करोनाचे संकट दिवसेंदिवस गडद होऊ लागल्यामुळे शहरी भागातून गावोगावी नागरिकांचे लोंढे येऊ लागले आहेत. मुंबई, पुणे, औरंगाबाद, सोलापूर, मालेगाव आदी भागांत मोठ्या प्रमाणात रुग्ण असल्याने या भागातून ग्रामीण भागात गाडी आली की ग्रामस्थांना धडकीच बसत आहे. गाव सुरक्षित ठेवण्यासाठी गावोगावी ग्रामस्थ खडा पहारा देत असून अनेक ठिकाणी मुंबईकरांच्या अरेरावीचा सामनाही ग्रामस्थांना करावा लागत आहे.
सातारा जिल्ह्यात करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यात प्रशासनाला चांगले यश आले आहे. विशेषत: रुग्ण बरे होण्याचे प्रमाण चांगले आहे. परिणामी मुंबई, पुण्यासह राज्याच्या कानाकोपऱ्यातून नागरिकांचे लोंढे सातारा जिल्ह्यात येत आहेत. अनेकजण ऑनलाईन पास घेऊन येत आहेत तर अनेकजण बेकायदेशीरपणे येत असल्याच्या घटनाही उघडकीस आल्या आहेत. करोनाची लक्षणे असतानाही अनेकजण प्रवास करत असून त्यातून करोनाचे संकट आणखी गडद होण्याचा धोका आहे. त्यामुळे संबंधितांना पास देताना ते प्रतिबंधित क्षेत्रात वास्तव्य करतात का, त्यांच्यामध्ये करोनाची लक्षणे आहेत का, याची तपासणी होण्याची गरज आहे.
ग्रामीण भागात नागरिकांनी चांगली सतर्कता बाळगली आहे. बाहेरच्या जिल्ह्यातून येणाऱ्या नागरिकांनाही प्रवेश देण्यास ग्रामस्थांची हरकत नाही. मात्र, प्रशासनाच्या सूचनांचे त्यांनी काटेकोरपणे पालन करणे गरजेचे आहे. वास्तविक पुण्या- मुंबईतून येणारी वाहने चेक नाक्यावर तपासण्यात येत आहेत. ज्यांच्यामध्ये करोनासदृश्य लक्षणे आहेत, अशांना तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात येत आहे. चेक पोस्टवरच नागरिकांना होम क्वारंटाईनचे शिक्के मारण्यात येत आहेत. वैयक्तिक कोणाची राहण्याची सोय असेल तर त्यांना घरात आणि सोय नसणाऱ्यांना शाळांमध्ये क्वारंटाइन करण्यात येत आहे.