पुणे – महापालिकेत समाविष्ट 23 गावांमध्ये आता सांडपाणी वाहिन्यांसोबतच पावसाळी वाहिन्याही टाकण्यात येणार आहेत. त्यासाठी सल्लागार नेमण्यात येणार असून, महापालिकेने निविदा मागवल्या आहेत. पावसाळी वाहिन्या नसल्याने यंदा हडपसर, बावधन, धायरी, लोहगाव, उंड्री, पिसोळीसह दक्षिण पुण्यातील काही गावांमधे पूरस्थिती उद्भवली होती. त्यानंतर आता प्रशासन आधी पाणी, ड्रेनेजसह पावसाळी वाहिन्या टाकण्याचे कामही हाती घेणार आहे.
मात्र, आधीच 23 गावांच्या सांडपाणी योजनेसाठी कर्ज उभारणार असताना या कामासाठी निधी कसा उपलब्ध होणार, याबाबत प्रशासनाकडे उत्तर नाही. या गावांमध्ये कुठेही पावसाळी वाहिन्याच नाहीत. नाले, ओढे तसेच रस्त्यांवर अतिक्रमणे झाल्याने गावांमधील पावसाळी पाणी वाहून जाण्याची सद्यस्थितीची माहिती महापालिकेस नाही. महापालिकेत या गावांचा समावेश करण्यात आला असला, तरी गावांचा विकास आराखडा “पीएमआरडीए’कडून तयार करण्यात येत आहे. तो अद्याप मान्य झालेला नाही.
त्यामुळे या गावांमध्ये महापालिकेस विकासकामे “आरपी’नुसार (प्रादेशिक आराखडा) काम करावे लागत आहे. त्याचा आधार घेऊनच या गावांचा पावसाळी जलवाहिन्यांचा आराखडा तयार केला जाणार आहे. प्रामुख्याने सल्लागारांकडून नाले, ओढे तसेच रस्त्यांची मंजूर लांबी, रुंदीच्या आधारावर प्रत्यक्ष गावात असलेल्या स्थितीची पडताळणी केली जाणार आहे. त्यानुसार किती पावसाळी वाहिन्या रस्त्याच्या कडेला टाकायच्या, नाले-ओढ्यांवर किती ठिकाणी कल्वर्ट बांधायचे? तसेच पाण्याचा निचरा करण्यासाठी आणखी काय उपाययोजना करायच्या, याबाबत हा आराखडा तयार केला जाणार आहे.
केंद्राकडे करणार निधीची मागणी
- या कामासाठी राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाकडे निधीसाठी प्रस्ताव पाठवण्यात येणार
- पुणे शहराचा समावेश पूरग्रस्त महानगरांमध्ये आहे. त्याअंतर्गत पावसाळी पाणी व्यवस्थापनासाठी सुमारे 350 कोटींचा निधी मिळणार.
- पालिकेकडून 23 गावांच्या निधीसाठी केंद्राकडे प्रस्ताव पाठवण्यात येणार आहे.