पुणे – महात्मा जोतिबा फुले यांनी प्रस्थापित साहित्यातील पात्र बदलत साहित्यात बहुजन, श्रमिक, शुद्र, अतिशुद्रांना नायकाचे स्थान दिले, असे करून त्यांनी त्यांच्या आयुष्यातील संघर्ष विविध साहित्याच्या रूपात समाजासमोर मांडला, असे प्रतिपादन शिवाजी विद्यापीठाच्या मराठी विभागाचे प्राध्यापक डॉ. रणधिर शिंदे यांनी केले.
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात महात्मा ज्योतिबा फुले यांच्या पुण्यतिथी निमित्त व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. याप्रंसगी ते बोलत होते. यावेळी कुलगुरू डॉ. सुरेश गोसावी, प्र-कुलगुरू डॉ. पराग काळकर, प्रभारी कुलसचिव डॉ. विजय खरे, वित्त व लेखा अधिकारी चारूशिला गायके, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर अध्यासनाचे प्रमुख डॉ. मनोहर जाधव, महात्मा फुले अध्यासनाचे प्रमुख डॉ. सुनिल भंडगे यांनी प्रशासकीय इमारती समोरील महात्मा ज्योतिबा फुले यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.
फुले यांचे साहित्य समाजाचे वास्तव्य मांडणारे आहे, त्यांनी साहित्यात समाजिक परिवर्तन, सामाजित बांधिलकी, स्त्री-पुरूष समानता, समाजातील पिडितांची व्यथा मुख्यत्वाने मांडली आहे. त्यांनी प्रस्थापित साहित्यिक भाषा न वापरता सामान्यांना समजणारी, रांगडी, खेळवड, देशीपण असलेली जनसंवादाची बोलीभाषा वापरली असल्याचेही डॉ. रणधिर शिंदे यांनी सांगितले.
तसेच छत्रपती शिवाजी महाराजांची लोककल्याणकारी राजा म्हणून ख्याती मिळवून देण्यात फुले यांच्या साहित्याचे मोठे योगदान असल्याचेही ते यावेळी म्हणाले. दरम्यान, महात्मा ज्योतिबा फुले यांचे विचार सध्याच्या काळात खूप महत्त्वाचे असून त्या विचारांचा प्रचार-प्रसार होणे गरजेचे असल्याचे कुलगुरू डॉ. गोसावी म्हणाले. याप्रसंगी डॉ. सदानंद भोसले, तसेच डॉ. श्रृती तांबे, डॉ. गिता शिंदे यांच्यासह आदी उपस्थित होते.