पुणे – राज्यातील कनिष्ठ महाविद्यालयातील तासिका तत्वावरील शिक्षकांना केवळ प्रति तासिका केवळ 72 रुपये एवढे तुटपूंजे मानधन देण्यात येते. गेल्या बारा वर्षांत या मानधनात एक रुपयाचीही वाढ झालेली नाही. मानधन वाढविण्याबाबत शासनच उदासिन असल्याचे बोलले जात आहे.
मागील काही वर्षांमध्ये कनिष्ठ महाविद्यालयात पुरेशा प्रमाणात शिक्षकांची भरतीच झालेली नाही. त्यामुळे तासिका तत्वावर नियुक्त्या केल्या जातात. तासिका तत्वावरील शिक्षकांना पूर्वी प्रति तास केवळ 20 रुपये एवढे मानधन देण्यात येत होते. त्यात वाढ करून 72 रुपये एवढे मानधन करण्यात आले. त्यात आजतागायत वाढ झालेली नाही.
माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण संचालनालयाकडून 2015 मध्ये मानधन वाढीचा प्रस्ताव शासनाकडे सादर केला होता. पुन्हा 2016 मध्ये तत्कालीन संचालक एन. के. जरग यांनी प्रति तास 72 रुपयांऐवजी 125 रुपयेप्रमाणे मानधन वाढीचा प्रस्ताव शासनाकडे पाठविला होता. त्यावर अद्यापही निर्णय झालेला नाही.
कनिष्ठ महाविद्यालयीन स्तरावरील तासिका तत्वावरील शिक्षकांच्या सुधारित मानधनासाठी आता पुन्हा शासनाकडे प्रस्ताव सादर करावयाचा आहे. 2018-19 च्या संच मान्यतेनुसार तासिका तत्वावरील शिक्षकांची संख्या सादर करावी लागणार आहे. त्यामुळे राज्यातील सर्व विभागीय शिक्षण उपसंचालकांनी तत्काळ ही माहिती सादर करावी.
– डॉ. वंदना वाहुळ, शिक्षण उपसंचालक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण संचालनालय