पुणे – शहरात पावसाळापूर्व नालेसफाई, ड्रेनेज तसेच पावसाळी वाहिन्यांच्या स्वच्छतेचे काम 100 टक्के झाल्याचा दावा महापालिकेने केला होता. मात्र, रविवारी झालेल्या पावसाने मध्यवर्ती पेठा, तसेच डेक्कन परिसराला जोडणाऱ्या अनेक रस्त्यांवर अवघ्या 10 ते 12 मि.मी. पावसानेही तळी साचली. अनेक ठिकाणी ड्रेनेज तसेच पावसाळी वाहिन्या नसल्याने पूरस्थिती रोखण्यासाठी स्वतंत्र पथके नेमण्यात आली आहेत. ती चोवीस तास सज्ज ठेवण्याच्या सूचना मनपा प्रभारी आयुक्त रवींद्र निवडे यांनी संधित विभाग प्रमुखांना दिल्या आहेत.
बिनवडे म्हणाले, पावसाळापूर्व कामे पूर्ण झालेली आहेत. तर, पूर्वमोसमी पाऊन न झाल्याने पाणी साचणाऱ्या ठिकाणांचा अंदाज लावणे शक्य होत नाही. मागील वर्षी पाणी साचणाऱ्या ठिकाणीही कामे केलेली आहेत. मात्र कर्वेरस्ता, जंगली महाराज रस्ता, नगररस्ता तसेच काही भागात पाणी साचत असले तरी तेथे पावसाळी वाहिन्या तसेच ड्रेनेजचे जाळे नाही. अशा ठिकाणांसाठी क्षेत्रीय कार्यालयांच्या स्तरावर स्वतंत्र पथके नेमण्यात आली असून त्यात, बिगारी, अभियंते यांच्यासह, पाणी काढण्याचे, गाळ काढण्याचे पंप, जेसीबी तसेच इतर आवश्यक साहित्य उपलब्ध करून देण्यात आले आहेत. अधिकाऱ्यांनी योग्य समन्वय ठेवावा, असे बिनवडे यांनी सांगितले.
कर्मचारी फोन बंद ठेवतात..
प्रभारी आयुक्तांनी बोलविलेल्या या बैठकीत अग्निशमन दलाने उद्यान विभागाबाबत थेट तक्रार केली. पावसाळ्यात झाडपडीच्या घटना घडतात. अशा वेळी उद्यान विभागाची मदत आवश्यक असते. मात्र, शनिवारी- रविवारी उद्यान विभागाच्या कर्मचाऱ्यांचे मोबाइल बंद असल्याच्या तक्रारी करण्यात आल्या. या तक्रारीची गंभीर दखल घेत, सुट्टीचा दिवस असला तरी पावसाळ्यात विभागप्रमुख तसेच कर्मचाऱ्यांनी मोबाइल बंद ठेवू नयेत, अन्यथा कारवाई केली जाईल असा इशाराही यावेळी देण्यात आला.
शहरात कोठेही झाडपडी, पाणीसाचणे, नाल्यांची सफाई न होणे, खराब रस्ते अथवा पूरसदृश परिस्थिती उद्भवल्यास “हे आपल्या विभागाचे काम नाही’ असे न समजता तत्काळ मनपा आपत्ती व्यवस्थापन कक्ष तसेच संबंधित विभागास सूचना द्याव्यात, असे आदेश विभागप्रमुखांना दिले आहेत, असे मनपाचे प्रभारी आयुक्त रवींद्र बिनवडे म्हणाले.