– माधव विद्वांस
बांगलादेशच्या विजयाचे शिल्पकार, स्वतंत्र भारताच्या संरक्षणदलाचे पहिले फिल्डमार्शल सॅम होरमुसजी फ्रामजी जमशेदजी माणेकशॉ यांचा आज स्मृतिदिन. माणेकशॉ यांचा जन्म पंजाबमधील अमृतसर येथे 3 एप्रिल 1914 रोजी झाला. त्यांचे वडील डॉ. होरमुसजी माणेकशॉ तर आईचे नाव हिराबाई होते. माणेकशॉ कुटुंब मूळचे वलसाड, गुजरात येथील होते. त्यांचे शालेय शिक्षण अमृतसर येथे झाले. त्यानंतर त्यांनी नैनिताल येथील शेरवूड कॉलेजमध्ये महाविद्यालयीन शिक्षण घेतले. त्यांच्या वडिलांची त्यांनी डॉक्टर व्हावे अशी इच्छा होती; परंतु त्यांनी डेहराडून येथे असलेल्या भारतीय मिलिटरी ऍकॅडमीमध्ये प्रवेश घेतला.
सॅम माणेकशॉ हे भारतीय मिलिटरी ऍकॅडमीमधून बाहेर पडणाऱ्या पहिल्या तुकडीचे विद्यार्थी होते. वर्ष 1934 मध्ये पदवी प्राप्त झाल्यावर त्यांची सेकंड लेफ्टनंटपदी नियुक्ती झाली. ब्रिटिश लष्करात व भारतीय लष्करात आपली जवळजवळ चाळीस वर्षांची कारकीर्द माणेकशॉ यांनी पार पाडली. दुसरे महायुद्ध तसेच 1948, 1965 व 1971 या तिन्ही भारत-पाक तसेच 1962च्या चीन युद्धात, असा चार वेळा माणेकशॉ यांचा सहभाग होता.
दुसऱ्या महायुद्धात ते कॅप्टनच्या हुद्द्यावर होते. त्यावेळी ते पॅगोडा हिल्सवर ताबा मिळवताना ब्रह्मदेशच्या सितांग नदीच्या मोहिमेवर होते. येथे झालेल्या लढाईत ब्रिटिश लष्कराने नुकसान सोसूनही मोहीम फत्ते केली. माणेकशॉ यांना एलएमजीच्या गोळ्या लागल्या व ते गंभीर जखमी झाले. त्यावेळी डॉक्टरांनी त्यांच्या जगण्याची अशा सोडली होती. मात्र, डॉक्टरांनी शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय घेतला व ते यशस्वी झाले.
जनरल कुमारमंगलम यांच्याकडून 7 जून 1969 रोजी त्यांनी सैन्यप्रमुख पदाची सूत्रे हाती घेतली. 1971च्या पूर्व पाकिस्तानातील (सध्याचा बांगलादेश) पाकिस्तानविरोधी उठाव मोडण्यासाठी पाकिस्तानी लष्कराने बांगलादेशी जनतेवर अत्याचार सुरू केले होते. त्यामुळे बांगलादेशमधील नागरिक निर्वासित होऊन भारतात आश्रयासाठी येऊ लागले. यावेळी भारताच्या पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी मुत्सद्दीपणाने बांगलादेशाला स्वातंत्र्य मिळवून दिले. यामध्ये भारतीय लष्कराचा मोठा वाट होता.
यावेळी भारताने माणेकशॉ यांच्या नेतृत्वाखाली पाकिस्तानचा पराभव केला. 16 डिसेंबर 1971 रोजी पाकच्या ले. ज. नियाझी यांनी भारत व बांगलादेशच्या संयुक्त सैन्याचे प्रमुख लेफ्टनंट जनरल जगजितसिंह अरोरा यांच्या समोर शरणागती पत्करली. त्यांच्या अपूर्व कर्तबगारीच्या गौरवार्थ त्यांना “पद्मभूषण’ या सन्मानाने सन्मानित केले.
तसेच त्यांना संरक्षणदलाचे आजीव फिल्डमार्शल बनविण्यात आले. निवृत्तीनंतर त्यांनी आपला बहुतांश वेळ पत्नी सिलू यांच्यासमवेत निलगिरी टेकड्यांतील कुन्नूर येथे पुष्पसंवर्धन आणि कुक्कुटपालन व मधुमक्षिका संगोपन या कार्यात घालविला. माणेकशॉ यांचे 27 जून 2008 रोजी वेलिंग्टन येथील सैनिकी रुग्णालयात निधन झाले.