पुणे- प्रभाग रचनेच्या 1 हजार 515 हरकती-सूचनांपैकी 353 हरकती गुरुवारी ऐकून घेण्यात आल्या. उरलेल्या 2 हजार 081 हरकतींवर शुक्रवारी सुनावणी घेण्यात येणार आहे. प्रभाग रचनेवर एकूण 3 हजार 596 हरकती-सूचना आल्या आहेत.
बालगंधर्व रंगमंदिरात सकाळी दहा वाजता “यशदा’चे महासंचालक आणि राज्य निवडणूक आयोग प्राधिकृत अधिकारी एस. चोक्कलिंगम यांच्यापुढे या हरकती-सूचना सादर करण्यात आल्या आहेत. या दिवशी नव्या रचनेतील प्रभाग 1 ते 20, 27 ते 31 आणि 33 ते 35 या प्रभागातील तक्रारदारांना बोलावण्यात आले होते. यामध्ये आजी-माजी नगरसेवक, नागरिक, सोसायट्यांचा समावेश होता. गटश: या हरकती नियोजित केल्या आहेत. चोक्कलिंगम यांनी हरकती-सूचना ऐकून घेतल्या. दोन दिवस ही सुनावणी चालणार आहे.
यावेळी महापालिका आयुक्त विक्रम कुमार, अतिरिक्त आयुक्त रवींद्र बिनवडे, अप्पर जिल्हाधिकारी सूरज वाघमारे, राज्य निवडणूक आयोगाचे सचिव दीपक नलावडे, राज्य निवडणूक आयोगाचे अप्पर सचिव अतुल जाधव, राज्य निवडणूक आयोगाचे उपायुक्त अविनाश सणस, पुणे महापालिकेतील उपायुक्त आणि निवडणूक अधिकारी अजित देशमुख आदी उपस्थित होते.
गुरुवारी जी सुनावणी झाली त्यामध्ये ज्या प्रभागातील तक्रारदारांना बोलावले होते, त्यातील जे अनुपस्थित राहिले त्यांची पुन्हा सुनावणी होणार नाही. तोच नियम शुक्रवारीही लागू असून, पुन्हा त्या प्रभागांवर सुनावणी होणार नाही.
प्रवेशद्वाराबाहेर हुज्जत
काहींना सुनावणीची माहिती मिळाली नाही, तर काहींना केवळ मेसेज आले, अशा तक्रारी घेऊन काही नागरिकांनी बालगंधर्वच्या प्रवेशद्वाराबाहेर हुज्जत घातली. काहीवेळ तेथे तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. परंतु त्यांच्याजवळील मेसेजेस पाहिल्यानंतर त्यांना पोलीस आणि सुरक्षारक्षकांनी सुनावणीच्या ठिकाणी जाण्याला परवानगी दिली.