पुणे – पुणे महापालिकेने सुमारे अकरा कोटी रुपयांची जादाची तरतूद करून आंबिल ओढा परिसरात सीमा भिंत उभारण्याच्या कामाला चालना दिली आहे. पण या कामातून पुन्हा पद्मावती पूल भागातील गुरुराज को-ऑप सोसायटीच्या भिंतीचे काम वगळले आहे. महापालिकेकडून आपल्यावर मोठा अन्याय झाल्याची भावना त्यामुळे या सोसायटीतील रहिवाशांमध्ये निर्माण झाली आहे.
पुण्यात दोन वर्षांपूर्वी आलेल्या पुरात या सोसायटीचे नुकसान झाले होते. त्यामुळे सोसायटीतील अनेक सदस्यांना घराबाहेर रात्र काढावी लागली होती. त्यावेळी अनेक माननीयांनी सोसायटीला भेट देऊन हे भिंतीचे काम उभारून देण्याची ग्वाही दिली होती. त्यामुळे महापालिकेकडून आज ना उद्या हे काम होईल, अशी सोसायटीतील सभासदांची आशा होती, पण प्रत्यक्षात येथील रहिवाशांच्या तोंडाला पानेच पुसली गेली आहेत.
सीमा भिंतीच्या नव्या कामात खासगी सोसायट्यांच्या भिंतीचे काम करायचे नाही असे धोरण ठरल्याचे सांगितले जात आहे. त्या संबंधात सोसायटीच्या काही सदस्यांनी नमूद केले की, आमच्या सोसायटीची जी भिंत पडली ती पूर्वी महापालिकेनेच बांधलेली होती. त्यामुळे ते नुकसान भरून देणे हे महापालिकेचेच काम आहे.
तसेच सार्वजनिक नाल्यांवरील बांधबंदीस्ती ही महापालिकेचीच जबाबदारी ठरते. त्यामुळे खासगी की सार्वजनिक हा मुद्दा उपस्थित न करता महापालिकेने ही आपली जबाबदारी आहे हे समजून नागरीकांना संरक्षण देणे महत्त्वाचे आहे. ही कनिष्ठ मध्यमवर्गीयांची सोसायटी आहे. त्यामुळे स्वखर्चाने हे काम करणे सोसायटी सदस्यांच्या आवाक्याच्या बाहेर आहे.
या पार्श्वभूमीवर महापालिकेने सोसायटीच्या सीमा भिंतीचे काम करून द्यावे, अशी मागणी सदस्यांनी केली असून या मागणीकडे महापालिकेचे लक्ष वेधण्यासाठी प्रतिकात्मक धरणे धरून आंदोलन करण्याचाही इशारा काही सदस्यांनी दिला आहे.