– रामचंद्र सोनवणे
राजगुरूनगर – राज्यात महाविकास आघाडीमध्ये मतभेद निर्माण होण्याची शक्यता निर्माण झालेल्या खेड पंचायत समिती सभापतिपदाच्या निवडणुकीत मित्रपक्ष शिवसेनेला राष्ट्रवादी कॉंग्रेसने पुन्हा एकदा धोबीपछाड दिला आहे. हा निर्णय पक्षाचा की स्थानिक आमदार दिलीप मोहिते पाटील यांचा याबाबत मतमतांतरे व्यक्त होत असली तरी यानिमित्ताने तालुक्यावरील पकड राष्ट्रवादीने सिद्ध केली आहे.
खेड पंचायत समितीत शिवसेना व मित्रपक्ष मिळून 14 पैकी 10 सदस्यांचे बहुमत आहे. इतरांना संधी मिळावी म्हणून माजी सभापती भगवान पोखरकर यांनी राजीनामा द्यावा असा आग्रह धरला होता. यावरून शिवसेनेच्या सहा सदस्यांनी बंडखोरी केली. पाच सदस्यांनी आमदार मोहिते पाटील यांच्या आश्रयाला जाणे पसंत केले.
हे सदस्य राजकीय सहलीला असताना त्यातील काहींना परत आणण्याचा प्रयत्न करताना त्या हॉटेलवर भगवान पोखरकर यांनी गोंधळ घातला. त्यावरून त्यांच्या सह 20 जणांविरुद्ध गुन्हा दाखल झाला. पोखरकर यांच्यासह काही जण अद्याप कारागृहात आहेत.
अविश्वास ठराव प्रकरणावरून शिवसेनेचे शिवाजीराव आढळराव पाटील आणि आमदार दिलीप मोहिते पाटील यांच्यात गेले तीन महिने आरोपांचा कलगीतुरा रंगला होता. तसेच राष्ट्रवादीच्या बाजूने पालकमंत्री तथा उपमुख्यमंत्री अजित पवार, शिवसेनेच्या खासदार संजय राऊत, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी देखील खेड तालुक्यावर लक्ष केंद्रित
केले होते.
..अन् नागरिक वेठीस
खेड पंचायत समिती सभापती दोनवेळा अविश्वास ठरावानंतर मंगळवारी (दि. 31) पुन्हा निवडणूक अशा तीनवेळा पंचायत समिती परिसरात संचारबंदी लावल्याने नागरिकांना वेठीस धरले गेले. शहरातील वाडा रस्ता वगळता सर्व रस्ते अरुंद असल्याने आणि ठीकठिकाणी पाणी आणि गटार योजनेची कामे सुरू असल्याने शहरात एकच कोंडी झाली होती.
सकाळी 6 पासून दुपारी तीन वाजेपर्यंत नागरिकांची मोठी गैरसोय झाली. वाहनचालक, नागरिक हैराण झाले. परिसरातील दुकानदारांनी सोशल मीडियावर पोलिसां विरोधात संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केल्या. पोलिसांचा मोठा बंदोबस्त ठेवण्यात आल्याने नागरिकांमध्ये खाकीची दहशत पसरली होती. तर कोणताही अनुचित प्रकार न घडता निवडणूक सुरळीत झाली.
शिवसेनेचे भविष्य धूसर?
शिवसेनेचे माजी खासदार आढळराव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली माजी आमदार स्व. सुरेश गोरे यांच्या प्रयत्नातून खेड पंचायत समितीच्या इतिहासात शिवसेनेला प्रथमच बहुमत मिळाले; मात्र स्व. गोरे यांच्या पश्चात सदस्यांनी पदासाठी हट्ट धरला आणि पक्षाच्या मोठ्या नेत्यांच्या वाट्याला मानहानी आणली, अशी भावना पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये आहे. तालुका स्तरावरील राजकारणात शिवसेनेचे भविष्य यामुळे धूसर होणार आहे.