मंचर-राज्यातील कृषिपंपांचे वीज कनेक्शन कट करू नये, असा हायकोर्ट आणि अन्न सुरक्षा आयोगाचा आदेश असताना या आदेशाचा अवमान करून पिंपळगाव खडकी (ता. आंबेगाव) येथील कृषिपंपांचे बेकायदा वीजजोड खंडित करणाऱ्या मंचर महावितरणाच्या अधिकाऱ्यांवर पोलिसांनी कारवाई करावी, अशी मागणी आंबेगाव तालुका स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी मंचर पोलीस ठाण्याला पत्र देऊन केली आहे.
आंबेगाव तालुका स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष प्रभाकर बांगर यांनी म्हटले आहे की, पिंपळगाव तर्फे महाळुंगे (ता. आंबेगाव) येथे महावितरण कंपनीचे मंचर येथील उपकार्यकारी अभियंता, निरगुडसर येथील कनिष्ठ अभियंता आणि जनमित्र यांनी पदाचा गैरवापर करून कृषी पंपाचे वीज जोड बेकायदा खंडित केले आहे. मुख्यमंत्र्यांनी या आधीच महावितरण कंपनीस कृषिपंपांचे वीज कनेक्शन कट करू नये, असा आदेश दिला होता.
तो डावलून संबंधित अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी मनमानी पद्धतीने हे कृत्य केले आहे. या कृत्यामुळे शेतकऱ्याच्या शेतातील उभी पिके पाण्याअभावी जळून चालली आहेत. या संबंधितांवर कायदेशीर कारवाई करून गुन्हे दाखल करण्यात यावेत, अशी मागणी करणारे निवेदन स्वाभिमानी शेतकरी संघटनेतर्फे आंबेगाव तालुका अध्यक्ष प्रभाकर बांगर यांनी तहसीलदार, महावितरणचे कार्यकारी अभियंता आणि मंचर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक यांना दिले आहे.
या निवेदनासोबत उच्च न्यायालयाच्या आदेशाच्या प्रती, अन्न सुरक्षा आयोगाच्या निकालाच्या प्रती व मुख्यमंत्र्यांच्या आदेशाच्या प्रति सोबत जोडल्या आहेत. संबधितांवर गुन्हा दाखल न झाल्यास आणि कृषीपंपाचा वीज पुरवठा पूर्ववत न केल्यास स्वाभिमानी शेतकरी संघटना तीव्र आंदोलन करतील, असा इशारा अध्यक्ष प्रभाकर बांगर यांनी दिला आहे.