शिक्रापूर-सध्या राज्यभरात सरकारी कर्मचाऱ्यांनी पुकारलेले संप हे बेकायदेशीर आहे. यापुढे संप करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणी अखिल भारतीय ग्राहक पंचायतच्या महसूल समितीचे मध्य प्रांत प्रमुख रमेश टाकळकर यांनी पुणे जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे.
महाराष्ट्र राज्यात सर्वत्र महसूल, शिक्षण, आरोग्य, ग्रामपंचायतीसह आदी शासकीय विभागातील कर्मचारी अधिकाऱ्यांनी संप केला. या पार्श्वभूमीवर ते म्हणाले की, नागरिकांची शासकीय कामे रखडली जात आहेत. नागरिकांना मोठ्या त्रासांचा सामना करावा लागतो.
दैनंदिन कामात ग्राहकांना वेठीस धरणारे संप बेकायदेशीरच असल्याने शासकीय कर्मचारी व अधिकाऱ्यांनी कायदे पालनाने मागण्या शासन दरबारी मांडाव्यात ग्राहकांना वेठीस धरुन केलेल्या संपाचे समर्थन कधीही करता येणार नाही. शासनाने बेकायदेशीरपणे केलेल्या संपकरी कर्मचारी अधिकाऱ्यांचे वेतन कपात करुन शासकीय कर्मचाऱ्यांनी शासनाच्या विरोधात पुकारलेले आंदोलन हे बंड समजून त्यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणी टाकळकर यांनी पुणे जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांना निवेदन देऊन केली आहे.