वाल्हे – वाल्हे, दौंडज व (ता.पुरंदर) परिसरातील ऊस उत्पादक शेतकरी उसाला मोठ्या प्रमाणावर येत असलेले तुरे यामुळे हतबल होत आहेत. मागील काही दिवसांपासून वातावरणात होत असलेले बदल यामुळे ऊस पिकांसह सर्वच पिकांवर विपरीत परिणाम होताना दिसत असून, यामुळे शेतकरीवर्गाला दिवसेंदिवस मोठ्या आर्थिक संकटाला सामोरे जावे लागत आहे.
वाल्हे, दौंडज, पिसुर्टी, आडाचीवाडी, सुकलवाडी, वागदरवाडी (ता. पुरंदर) परिसरामधील उसाच्या क्षेत्राला तुरे उगवल्याने या तुऱ्याने उभ्या उसात पोकळी निर्माण होऊन, परिणामी उसाचं वजन 50 टक्के घटले जाते; असे शेतकरीवर्गाचे मत आहे. निसर्गाच्या लहरीपणाचे याला कारण असले तरी ऊस तोडणी मात्र दिवसेंदिवस लांबत आहे.
उसाच्या लागवडीनंतर त्याची तोडणी साधारण 15 ते 16 महिन्यांनी अपेक्षित असते. मात्र, साखर कारखानदार ही तोडणी दोन-तीन महिने लांबणीवर टाकतात. त्यामुळे उसावर तुरे उगवतात. व उभ्या उसाला पोकळ करतात. परिणामी वजनात किमान 50 टक्क्यांनी घट होते; मात्र यामध्ये साखरेची मात्र 100 टक्के निर्मिती होते, असे मत ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे आहे.
वाल्हे, दौंडज, पिसुर्टी व परिसरातील शेतकरी मोठ्या अडचणीत सापडला आहे. उसाचे पीक तोडणी योग्य झाले असून तरीदेखील साखर कारखान्याकडून ऊस तोडणी मजुरांची वाट परिसरातील शेतकरीवर्ग पाहात आहेत. शेतकऱ्यांचा ऊस तोडणीवाचून दिवसेंदिवस पुढे जात आहे. यामुळे परिसरातील शेतकरीवर्ग मोठ्या कचाट्यात सापडला आहे.
बळीराजा दुहेरी संकटात
शेतकऱ्यांवर एकीकडे अतिवृष्टीच्या संकटातून सावर असताना, दिवसेंदिवस वातावरणातील बदलाने शेतकरीवर्ग मेटाकुटीस आला आहे. शेतातील तोडणीला आलेला ऊस कारखाना तोडून घेत जात नसल्याने, शेतकरी दुहेरी संकटात अडकला आहे.
यंदा अतिवृष्टीमुळे पावसाचा मुक्काम वाढल्याने ऊसातील सरीमध्ये पाणी साचल्याने ऊस मुळांना अन्नद्रव्ये शोषता आली नाहीत. ऊसाला सूर्यप्रकाशाबरोबर उष्ण हवामानाची नित्तांत गरज असते. यावर्षी पावसाळा लांबल्याने व परतीच्या पावसाने ऊस उत्पादनावर परिणाम झाला असून, बदलत्या हवामानामुळे अनेक ठिकाणी ऊसाला तुरे आले आहेत.
– गीता पवार, कृषी सहायक