– विलास मादगुडे
हिरडस मावळ – भोर तालुका दुर्गम, डोंगराळ भाग असलेला तालुका आहे. या तालुक्यातील पश्चिम भागात भाताइतकेच बांबू पीकसुद्धा महत्त्वाचे आहे. या भागात बांबूसाठी पोषक जमीन आणि वातावरण असल्याने येथे बांबूची वाढ चांगली होत आहे, त्यामुळे आर्थिक उत्पन्न मिळणारे हमखास साधन म्हणून तालुक्याच्या पश्चिम भागातील शेतकरी बांबूकडे पाहत आहे.
भोर तालुक्यातील हिरडस मावळातील नीरा देवघर धारणाच्या दोन्ही भागांतील गावे, म्हसर, महुडे, वेळवंड, मळे, भुतोंडे या डोंगराळ खोऱ्यातील गावांत बांबूची बेटे मोठ्या प्रमाणात विकसित झाली आहेत. हा भाग नीरा देवघर आणि भाटघर धारणाच्या पाण्याने व्यापला असल्याने शेतजमिनी पाण्याखाली जास्त गेल्या आहेत. त्यात राहिलेला भाग हा डोंगराळ आहे, त्या
मुळे उत्पनाचे साधन असणारी शेती अल्प असल्याने येथील नागरिकांना रोजगारासाठी पुणे, मुंबई, कोकणसारख्या ठिकाणी जावे लागत आहे. काही लोक गावालाच राहून मिळेल तो कामधंदा करून आपली उपजीविका करत आहेत. स्थानिक रोजगार नाही, उत्पन्नाचे साधन नाही यामुळे सर्वसामान्य शेतकऱ्यांची आर्थिक परिस्थिती खालावली आहे.
या भागातील शेतकरी हमखास उत्पन्न मिळणारे साधन असलेल्या बांबू शेतीकडे वळत आहे; परंतु या शेतकऱ्यांकडे वाढलेला बांबू व्यापाऱ्याला विकण्याशिवाय दुसरा पर्याय नसल्याने म्हणवा तसा मोबदला त्यांच्या पदरी पडत नाही. येथील शेतकरी आर्थिकदृष्ट्या मजबूत होण्यासाठी एखादा बांबू प्रकल्प, बांबूपासून वस्तू बनवण्याचा कारखाना किंवा बांबूपासून महिलांना, युवकांना रोजगार मिळेल, शेतकऱ्यांना आर्थिक फायदा होईल यासाठी प्रशासन, राजकीय नेते मंडळींनी या बांबू शेतीकडे लक्ष देऊन रोजगारांची संधी निर्माण करण्याची गरज आहे.
तिसऱ्या वर्षांपासून उत्पन्न सुरू
बांबू जलद गतीने वाढणारी, सदाहरित, दीर्घायू वनस्पती आहे. याचे जीवनमान 40 ते 100 वर्षे असल्याने दरवर्षी बांबू लागवड करण्याची आवश्यकता नाही. कमी-जास्त पाऊस झाला तरी शेतीसारखे नुकसान होत नाही. डोंगर उतारावरील जमिनीवरही बांबूची लागवड करता येते. त्यामुळे लागवड केल्यानंतर थोडी काळजी घेतल्यावर खात्रीशीर उत्पन्न बांबू लागवडीच्या तिसऱ्या वर्षापासून मिळायला सुरुवात होते.
भोरमध्ये बांबू प्रकल्प होणे गरजेचे
शेती, हस्तकला, बांधकाम, फर्निचर, विविध वस्तू, कागद उद्योग, वाद्य निर्मिती आणि खाद्य इत्यादीसाठी बांबूचा वापर केला जातो. तालुक्यात बांबू पीक मोठ्या प्रमाणावर घेतलं जाते त्यामुळेच तालुक्यात विशेष करून पश्चिम भागात बांबू प्रकल्प होणे गरजेचे असून त्यातून तालुक्याची एक वेगळी ओळख निर्माण होईल. आर्थिकदृष्ट्या मावळातील जनतेलाही हातभार लागेल.
भोरमध्ये जनजागृती कार्यशाळा व्हाव्यात
हमखास उत्पन्न मिळणारे साधन असूनसुद्धा कृषी, वन विभाग या पिकाकडे दुर्लक्ष करीत आहेत. बांबूचा योग्य मोबदला मिळण्यासाठी बांबूपासून वस्तू निर्मितीसंबंधी जनजागृती करणे गरजेचे असून कृषी, वन, तसेच बांबूविषयी शासकीय संस्था यांनी या भागात येऊन कार्यशाळा भरवून बांबूसंबंधित असणाऱ्या योजना जनतेपर्यंत पोहोचवून त्यापासून भागातील शेतकरी,युवक व महिला बचत गटांना रोजगार उपलब्ध करून आर्थिक परिस्थिती सुधारण्यास मदत केली पाहिजे.