विश्रांतवाडी- राष्ट्रवादी कॉंग्रेसचे वडगाव शेरीचे आमदार सुनिल टिंगरे यांनी महापालिकेत समाविष्ट 34 गावांमधील विकास कामांसंदर्भात उपस्थित लक्षवेधी मांडली होती. समाविष्ट गावांमध्ये पाणी, रस्ते, ड्रेनेज, विद्युत व्यवस्था, उद्याने अशा पायाभूत सोयी-सुविधांची प्रचंड गैरसोय आहे. पालिकेत येऊनही गावांना विकासापासून वंचित रहावे लागत आहे. मतदारसंघातील लोहगाव गावातील समस्यांचा दाखला देत त्यांनी गावांसाठी महापालिकेकडे त्यासाठी पुरेसा निधी नाही. राज्य शासनाकडूनही मदत मिळत नाही. त्यामुळे या गावांच्या विकासासाठी अंदाजपत्रकात स्वतंत्र योजना करावी. राज्य शासनाने ही निधीची मदत करावी आणि सुविधा मिळेपर्यंत या गावांचा 50 टक्के कर माफ करावा, अशी मागणी आमदार सुनील टिंगरे यांनी केली.
मुख्यमंत्री शिंदे या लक्षवेधीवर उत्तर देताना म्हणाले की, गावांमधील पाणी पुरवठा, मल:निस्सारण योजनांसाठी निधीची तरतूद केलेली आहे. याशिवाय इतर विकासकामासाठी अंदाजपत्रकात स्वतंत्र निधीची तरतुद करण्याबाबत महापालिका आयुक्तांना तशा सूचना दिलेल्या आहेत. या गावांवर निधीच्या बाबतीत अन्याय होणार नाही आणि मूलभूत सोयी-सुविधा देन्याचे काम केले जाईल.
समितीत गावातील लोकप्रतिनिधी
पुणे महापालिकेप्रमाणेच समाविष्ट 34 गावांचा समतोल विकास व्हावा यासाठी महापालिका आयुक्तांना सूचना देण्यात येतील. तसेच विभागीय आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली एक समिती नेमली जाईल. त्यात महापालिका आयुक्तांसह 34 गावांमधील लोकप्रतिनिधी असतील. ही समिती या गावांमध्ये कोणती विकासकामे करायची यासंबंधीचा निर्णय घेऊन महापालिकेला तशी निधीची तरतूद करण्याची सूचना करतील असे मंत्री उदय सामंत यांनी स्पष्ट केले आहे.