कात्रज – महानगरपालिकेचे स्व. राजीव गांधी प्राणी संग्रहालय येथील तलावातील जलपर्णी काढण्याचे काम पालिकेकडून सुरू करण्यात आले आहे. परंतु, या कामात चक्क बालकामगारांकडून काम करून घेण्यात येत असल्याचे आढळून आले आहे. यासंदर्भात व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. धक्कादायक बाब म्हणजे दुर्गंधीयुक्त व गलिच्छ पाण्यात बालकामगारांना उतरवून जलपर्णी काढण्याचे काम करून घेण्यात येत आहे. यासंदर्भातील व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर तत्काळ त्या ठिकाणच्या बालकामगारांना तेथून जाण्यास सांगण्यात आले. मात्र, हे सर्व प्रकरण पाहता पालिकेमार्फत अशा प्रकारे बालकामगारांकडून काम करून घेण्याच्या प्रकारावर आजी-माजी स्थानिक नगरसेवक, राजकीय पदाधिकारी यांच्याकडून तिव्र प्रतिक्रिया उमटत आहेत. तर, महापालिकेचे अधिकारी अनभिज्ञ असल्याचे दिसते.
महापालिकेमार्फत जलपर्णी काढण्याकरीता कोट्यवधी रुपयांची निविदा काढून हे काम करण्यात येत असताना कमी वेतनामध्ये बालकामगार त्या ठिकाणी ठेवूण्याचा प्रकार चुकीचा असल्याचे मत अनेकांनी व्यक्त केले आहे. सदर ठिकाणी 10 ते 12 दिवसांपासून बालमजूर काम करीत आहेत. या मुलांचे वय 15 वर्ष ते 18 वर्षापर्यंत असून त्यांना धोकादायक पद्धतीने पाण्यात उतरवून काम करून घेतले जात आहे. धोकादायक पद्धतीने तलावातील जलपर्णी काढण्याचे काम करताना त्यांच्या आरोग्याला, जीवाला धोका उत्पन्न झाला आहे. याबाबत, संबंधित अधिकाऱ्यांनी लवकरात लवकर कार्यवाही करावी, अशी मागणी नागरकांमधून होत आहे.
जलपर्णी काढण्याच्या कामामध्ये संबंधित ठेकेदाराने नियमबाह्य काम केले असेल, तर त्यावर कारवाई करीत त्याला ब्लॅकलिस्ट करण्यात येईल. त्याकडील सुरू असलेली इतर कामेही काढण्यात येतील.
– कुणाल खेमनार, सह आयुक्त, मनपा पुणे