पुणे, (जिल्हा प्रतिनिधी)- एकेकाळी जिल्ह्यातील प्रस्थापित कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाशी दोन हात करीत संघटन बांधणी, निष्ठावंत शिवसैनिकांच्या बळावर वाढवलेली आणि बहरलेली शिवसेना अखेर माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हातून गेल्याचे वृत्त जिल्ह्यात समजताच निष्ठावंत आणि मराठी मनांवर अधिराज्य करणाऱ्या शिवसेनेबद्दल लोकांमधून हळहळ व्यक्त करण्यात आली. जिल्ह्यात शिवसेना सर्वसामान्यांचा आवाज म्हणून विस्तारली होती. केंद्रीय निवडणूक आयोगाच्या निर्णयानंतर जुन्नर, आंबेगाव, खेड, शिरूर, पुरंदर, हवेली तालुक्यातील शिवसेनेच्या स्थापनेपासून धगधगत्या कारकिर्दीला उजाळा मिळाला.
2014 पासून राज्यातील सत्ताकारणात एकेकाळचे मित्र पक्ष असलेले भाजप- शिवसेनेत राजकीय ठिणग्या उडू लागल्यानंतर जागावाटपावर युती तुटली. त्यावेळेपासून मोठ्या भावाच्या भूमिकेत असलेली शिवसेना स्वबळावर लढली. त्यावेळी शिवसेनेने (स्व) बाळासाहेब ठाकरे यांच्या पश्चात राज्यात यश मिळविले होते. भाजप सत्तेवर आल्यानंतर पुन्हा शिवसेना सत्तेत सहभागी झाली.
पाच वर्षांच्या कालावधीत शिवसेनेला दुय्यम वागणूक मिळाली. ही खदखद होत असताना 2019 मध्ये लोकसभा निवडणुकीत भाजपाने समान संधीवर युती केली. त्यावेळी राज्यात भाजप- शिवसेनेने जोरदार मुसंडी मारली होती. त्यावेळी जिल्ह्यात शिवसेनेला मावळची जागा राखता आली.
शिरूर मतदारसंघ शिवसेनेच्या हातून निसटली होती. सहा महिन्यांनंतर 2019 मध्ये भाजप- शिवसेनेने युती केली. त्यावेळी जिल्ह्यात जुन्नर, पुरंदर, खेडची जागा पुन्हा मिळवता आली नाही. जिल्ह्यात शिरूर लोकसभा मतदारसंघात शिवसेनेचे प्राबल्य हे गेल्या चाळीस वर्षांहून अधिक काळ आहे. जुन्नर, खेड, शिरूर, हवेली, आंबेगाव तालुक्यात माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील हे पूर्वाश्रमीच्या शिवसेनेत असताना संघटना फुलवली.
केंद्रीय निवडणूक आयोगाने शुक्रवारी (दि.17) सायंकाळी शिवसेनेचे नाव, चिन्ह हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाला दिल्याची घोषणा केल्यानंतर जिल्ह्यातील निष्ठावंत शिवसैनिकांमध्ये हळहळ उमटली होती. शिवसेनेने जिल्ह्यात एक प्रतिमा निर्माण केली आहे. शिरूर मतदारसंघात शिवसेनेला मानणारा वर्ग हा नेहमीच प्रस्थापितांविरोधात कौल देत आहे. पुरंदरमध्ये पूर्वाश्रमीचे माजी मंत्री विजय शिवतारे यांनी शिवसेनेच्या बळावर त्यावेळी नेतृत्व करीत राज्याचे लक्ष वेधून घेतले होते.
जिल्ह्यातील शिवसेनेच्या जुन्या राजकीय कारकिर्दीला, बाळासाहेब ठाकरे यांचे भाषण, माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे संयमी नेतृत्व याला उजाळा देत निष्ठावंतांनी हळहळ व्यक्त केली. संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यातील आक्रमक सहभाग, 1975 मधील आणीबाणीमध्ये बाळासाहेब ठाकरे यांच्या भूमिकेला यावेळी उजाळा मिळाला.
लोकशाहीला घातक- सुनील जाधव
सविंदणे- केंद्रीय निवडणूक आयोगाचा निर्णय लोकशाहीला घातक आहे. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी पहिल्यांदा संघटना आणि माणसं उभारली. चिन्ह नंतर आले, शिवसैनिकांनी खचून जायचं कारण नाही. पुन्हा नव्या जोमाने काम करायचे, अशी प्रतिक्रिया शिरूर शहरप्रमुख सुनील जाधव यांनी व्यक्त केली. जाधव म्हणाले की, शिरूरसह लाखो शिवसैनिकांनी आणि पदाधिकारी यांनी दिलेल्या प्रतिज्ञापत्रांना केराची टोपली दाखवणार, हा कसला न्याय आहे. आमचा पक्ष हा उद्धव बाळासाहेब ठाकरे आहे. ते सांगतील ते आमचं चिन्ह आहे.
नाव आणि चिन्ह बदललं तरी बाळासाहेब व उद्धव ठाकरे यांच्यावरील शिवसैनिकांचे व महाराष्ट्राच्या जनतेचे प्रेम कमी होणार नाही. चिन्हाची आणि पक्षाच्या नावाची चोरी केली असली तरी उद्धव ठाकरे हे पूर्ण ताकदीने संघटना उभी करतील. त्यामुळे महाराष्ट्रात पुन्हा एकदा नवचैतन्य निर्माण होईल.
– राजेंद्र काळे, जिल्हाप्रमुख, उद्धव बाळासाहेब ठाकरे, शिवसेना