– राजेंद्र (बापू) काळभोर
लोणी काळभोर – खडकवासला प्रकल्पातून ग्रामीण भागातील शेतीसाठी पहिल्या उन्हाळी आवर्तनाला सोमवारपासून (27 फेब्रुवारी) सुरुवात झाली आहे. खडकवासला धरण साखळीत एकूण 64 टक्के पाणीसाठा असल्याची माहिती मिळाल्यामुळे या पाण्यावर अवलंबून असलेल्या हवेली, दौंड व इंदापूर तालुक्यातील 66 हजार हेक्टर जमिनीचे मालक असलेले शेतकरी खूश झाले आहेत. या पाण्याचे योग्य नियोजन करून जलसंपदा विभागाने पुणे शहराला पिण्याच्या पाण्याची सोय करताना ग्रामीण भागातील शेती व शेतकऱ्यांवर अन्याय करू नये, अशी अपेक्षा शेतकरी व्यक्त करत आहेत.
गेल्या काही वर्षांत खडकवासला धरण साखळीतील पाणी नवा मुठा उजव्या कालव्यात सोडताना शेतीऐवजी शहराच्या पिण्याच्या पाण्याला प्राधान्य दिले जात आहे. पुणे शहरातील नागरिकांना पिण्यासाठी पाणी दिलेच पाहिजे; परंतु त्याचवेळी ग्रामीण भागातील शेतक-यांवरही अन्याय होऊ नये ही माफक अपेक्षा शेतकरी व्यक्त करत आहेत. मात्र बहुतेक राजकीय पक्ष अशावेळी शेतकऱ्यांच्या बाजूने उभे रहात नाहीत हा यापूर्वीचा अनुभव आहे.
पुणे महानगर पालिकेने आपल्या हद्दीत होणारी पाणी गळती व समतोल पाणी वाटप या बाबींकडे तातडीने व काळजीपूर्वक लक्ष देण्याची गरज आहे. या संदर्भात आवश्यक तो निधी राज्य सरकारने ही महानगर पालिकेला उपलब्ध करून दिला पाहिजे.
खडकवासला धरण साखळी बरोबरच सध्या भामा आसखेडचे पाणी ही उपलब्ध होत असल्याने शेतकऱ्यांना झुकते माप देण्याचा निर्णय महानगर पालिकेने घेतला पाहिजे. शहर व ग्रामीण या दोन्ही भागांवर अन्याय होणार नाही या संदर्भात जलसंपदा विभाग व महानगर पालिका यांनी समतोल व निःपक्षपातीपणे निर्णय घ्यावा.
खडकवासला धरण साखळीतील खडकवासला, पानशेत, वरसगाव व टेमघर या चारही धरणांच्या पाणलोट क्षेत्रात चालू पावसाळ्यात व्यवस्थित पाऊस पडला आहे. या चारही धरणांची एकूण क्षमता 29.15 टीएमसी आहे. गेले दिड महिना नवा मुठा उजव्या कालव्याचे पाणी बंद करण्यात आले होते.
गेला दिड महिना नवा मुठा उजव्या कालव्याला पाणी नसल्याने भूगर्भातील पाण्याची पातळी खालावली आहे. त्यामुळे हैराण झालेल्या शेतकऱ्यांनी बाजारभावापेक्षा शंभर – दोनशे रुपये कमी भावाने आपला ऊस गुऱ्हाळांना देऊन टाकला. विहीरीं, कूपनलिका यांसारख्या सर्व नैसर्गिक उदभवांना पाणी कमी झाल्याने शेतकऱ्यांनी जास्त वेळा पाणी मागणारी कोथिंबीरी सारखी पीके घेणे बंद केले होते.
आता नवीन मुठा उजवा कालव्यात पाणी सोडण्यात आले आहे. साधारण दिड महिना जरी कालव्यामधून हे पाणी वाहिले तर पाणी वाहणे बंद झाल्यानंतर पुढील महिनाभर या तीनही तालुक्यातील विहिरी व कूपनलिकांना पाणी राहणार आहे. त्यामुळे आगामी काही महिने या तीनही तालुक्यातील 66 हजार हेक्टर क्षेत्रावरील शेतीला पाणी पुरवठा होणार आहे.
अस्तरीकरणाला विरोध
नवीन मुठा उजव्या कालव्याला आतल्या बाजूने अस्तरीकरण करण्याचे काम मध्यंतरी सुरू करण्यात आले होते. स्थानिक शेतकरी या अस्तरीकरणाच्या कामाला विरोध करत आहेत; मात्र सत्ताधारी किंवा विरोधी पक्ष कुणीच या शेतकऱ्यांच्या मागे उभे राहून अस्तरीकरणाला विरोध करत नाही. संपूर्ण कालव्याचे अस्तरीकरण झाल्यावर कालव्यातून पाणी न पाझरल्यामुळे परिसरातील विहिरी, बोअर कोरड्या पडून पिण्याच्या पाण्यासह शेतीच्या पाण्याचाही दुष्काळ पडणार आहे. त्यावेळी शेतकरी व तत्कालीन विरोधी पक्ष जागा होईल; मात्र तोपर्यंत वेळ निघून गेलेली असेल.
त्यानंतरच दुसरे आवर्तन
नवीन मुठा उजवा कालव्यातून हे आवर्तन देण्यात येत आहे. पुढील 50 दिवस कालव्यातून पाणी दिले जाणार आहे. हे आवर्तन सुमारे 4.5 ते 5 टीएमसी इतके असणार आहे. शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या टेमघर, वरसगाव, पानशेत आणि खडकवासला या चारही धरणांत मिळून एकूण 18.74 टीएमसी म्हणजेच 64.27 टक्के पाणीसाठा उपलब्ध आहे. पहिल्या उन्हाळी आवर्तनाद्वारे पाच टीएमसी पाणी सोडण्यात येणार आहे. त्यानंतर उन्हाळ्यात धरणांमध्ये उपलब्ध पाण्याचा अंदाज घेऊन ग्रामीण भागासाठी दुसरे उन्हाळी आवर्तन देण्याचा निर्णय घेतला जाणार आहे.