पुणे -जिल्ह्यातील 221 ग्रामपंचायतींत चुरशीच्या लढती होत असून त्यात प्रत्येक तालुक्यातील मोठ्या ग्रामपंचायतींत पक्षांच्या स्थानिक नेत्यांनी लक्ष घातले आहे. आमदार-खासदारांनीही स्थानिक गटांना विविध माध्यमातून ताकद देण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे मोठ्या ग्रामपंचायतींत चुरशीच्या लढती होणार आहेत. आगामी जिल्हा परिषदेच्या निवडणुकीची नेत्यांकडून आतापासूनच तयारी सुरू आहे.
जिल्ह्यातील सर्वच ग्रामपंचायत निवडणुकीत आपल्या विचारांची सत्ता आणण्यासाठी नेते मंडळी सक्रिय झाले आहेत. आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीचा ग्रामपंचायत निवडणूक हा पाया आहे. त्यामुळे पाया भक्कम करण्यासाठी सर्वच पक्षाच्या नेत्यांनी ग्रामपंचायतींच्या निवडणुकीत लक्ष घातल्याचे दिसते. राष्ट्रवादीला बालेकिल्ल्यातच भाजप, बाळासाहेबांच्या शिवसेनेशी दोन हात करावे लागणार आहेत.
त्यासाठी राष्ट्रवादीला कॉंग्रेस व उद्धव ठाकरे गट शिवसेनेची साथ काही ठिकाणी मिळत आहे, त्यादृष्टीने रणनीती आखली आहे. त्यामुळे या सर्व पक्षांच्या नेत्यांना ग्रामपंचायतींच्या निवडणुका महत्त्वाच्या आहेत. आपल्या पक्षाच्या विचारांची सत्ता ग्रामपंचायतीत येण्यासाठी आमदार व खासदारांच्या गटाने जय्यत तयारी केली आहे. दरम्यान, कोणता गट सत्तेवर विराजमान होतो हे पाहणे औत्सुक्याचे ठरले आहे. अपक्ष उमेदवार मुसंडी मारतात की नाही हेही पाहणे तितकेच महत्त्वाचे ठरणार आहे.
मतदानासाठी अवघे तीन दिवस
मतदानासाठी अवघे तीन दिवस शिल्लक राहिल्यामुळे प्रचाराला वेगआला आहे. उमेदवारांनी घरोघरी जाऊन गाठीभेटी घेण्यासह सभा,बैठका घेण्यावर जोर दिला आहे. शुक्रवारी जाहीर प्रचाराची सांगता होणार असून यापूर्वी आपला वॉर्ड पुन्हा-पुन्हा पिंजून काढण्याचा उमेदवारांचा प्रयत्न आहे.
वैयक्तिक गाठी-भेटींवर भर
ग्रामपंचायत निवडणूक अखेरच्या टप्प्यात आली असून चुरशीचे वातावरण निर्माण झाले. निवडणुकीचे प्रमुख वैशिष्ट्य म्हणजे यावेळी आरोप-प्रत्यारोप एवढे झाले नाहीत. कॉर्नर मिटींग नाहीत. पर्यायाने मतदारांपुढे निवडणुकीचे मुद्दे गेले नाहीत. अगदी मौन धारण करून शांतपणे हाती बॅलेट पेपर घेत मतदारांच्या वैयक्तिक गाठी-भेटी घेण्यावर सर्व उमेदवारांनी भर दिला आहे. घराघरांत पोहोचण्याचा प्रयत्न होताना प्रकर्षाने दिसत आहे.