पुणे -महावितरणच्या नावे बनावट मेसेज पाठवत वीजबिल ऑनलाइन भरण्यास सांगितले जाते. यातून ग्राहकांच्या बॅंक खात्यातील रक्कम पळवली जाते. या प्रकारच्या सायबर गुन्ह्यांत राज्यात 95 गुन्हे दाखल करण्यात आले आहेत,’ अशी माहिती ऊर्जामंत्री तथा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत दिली.
वीजग्राहकांच्या नोंदणीकृत मोबाइल क्रमांकाचा डेटा लीक झाल्यामुळेच ऑनलाइन वीजबिल भरण्याचे बनावट संदेश पाठविण्यात येत असून, याबाबत संबंधितांवर कोणत्या स्वरूपाची कारवाई केली,’ असा प्रश्न आमदारांनी विचारला. त्यावर फडणवीस यांनी महावितरणचा कोणताही डेटा लीक झाला नसल्याचे स्पष्ट केले.
महावितरणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालकांनी वीजग्राहकांना अशा बनावट संदेशांना प्रतिसाद न देण्याचे आवाहन केले आहे. महावितरणकडे नोंदणीकृत असलेल्या किंवा नसलेल्या मोबाइल क्रमांकांवर असे बनावट एसएमएस’ येत आहेत. या प्रकारच्या संदेशांमध्ये ग्राहकांचा वैयक्तिक किंवा वीज बिलासंबंधी तपशील आढळून येत नाही. अशा प्रकारचे बनावट संदेश इतर वीज वितरण कंपन्यांच्या ग्राहकांनादेखील येत आहेत,’ असे फडणवीस यांनी लेखी उत्तरात नमूद केले आहे.
अशी होते वीजग्राहकांची फसवणूक
सायबर चोरट्यांकडून खासगी क्रमांकांवरून वीजग्राहकांच्या मोबाइलवर संदेश पाठवला जातो, किंवा कॉल केला जातो. मी महावितरणमधून बोलत असून, तुम्ही मागील महिन्यांचे वीजबिल भरलेले नसल्याने रात्री साडेनऊ वाजता वीजपुरवठा बंद करण्यात येणार आहे,’ असे सांगून हे भामटे वीजग्राहकांना धमकावतात.
कारवाई टाळण्यासाठी वीजग्राहकांना मोबाइलवर ऍप्लिकेशन’ डाउनलोड करायला सांगतात. वीजग्राहकांनी संबंधित ऍप डाउनलोड केल्यावर त्यांच्याकडे चोरटे ओटीपी (वन टाइम पासवर्ड) मागतात. वीजग्राहकांकडून ओटीपी’ घेतल्यावर चोरटे त्यांच्या बॅंक खात्यांमधून पैसे लांबवितात.