बारामती -जैन धर्मियांचे तीर्थक्षेत्र असलेल्या श्री सम्मेद शिखरजीस पर्यटन क्षेत्र घोषित करण्याच्या निर्णयाच्या विरोधात तसेच गुजरातमधील पवित्र तीर्थक्षेत्र श्री शत्रूंजय तीर्थ, पालीथाना व इतर जैन तीर्थक्षेत्र येथे होणाऱ्या अतिक्रमणा विरोधात बारामतीतील सकल जैन समाजाच्या वतीने आज मूक मोर्चा काढत निषेध नोंदविला गेला. मोर्चानंतर उपविभागीय अधिकारी दादासाहेब कांबळे यांना निवेदन देण्यात आले.
झारखंड सरकार आणि केंद्र सरकारने जैन धर्मियांचे पवित्र तीर्थक्षेत्र असलेले श्री सम्मेद शिखरजी स्थळ हे पर्यटन क्षेत्र म्हणून घोषित केल्याबद्दल आणि तसेच गुजरात मधील पवित्र तीर्थक्षेत्र श्री शत्रूंजय तीर्थ, पालीथाना व इतर जैन तीर्थक्षेत्र येथे होणाऱ्या अतिक्रमणा विरोधात आज बारामतीतील श्री महावीर भवन येथून सकल जैन समाजाचा मूक मोर्चा प्रशासकीय भवन पर्यंत निघाला. यावेळी सकल जैन समाजाच्या शिष्टमंडळाने प्रांताधिकारी दादासाहेब कांबळे यांना निवेदन दिले.
या मध्ये समाजची भूमिका विशद केली गेली. यावेळी कॉंग्रेसचे वीरधवल गाडे, मनसेचे ऍड. नीलेश वाबळे आणि शिवसेना ठाकरे गटासह शेर सुहास मित्र मंडळाच्या वतीने शुभम अहिवळे, प्रा. रमेश मोरे, गौतम शिंदे यांनी या मोर्चाला पाठिंबा दिला. सकल जैन समाजातील महिला व पुरुषांनी आज मोठ्या प्रमाणात या मोर्चास हजेरी लावत आपला निषेध व्यक्त केला.
या मोर्चामधील महिलांचा आजचा सहभाग लक्षणीय असाच होता. दरम्यान जैन बांधवांच्या सर्व भावना राज्य व केंद्र सरकारपर्यंत पोहोचविण्याची ग्वाही उपविभागीय अधिकारी दादासाहेब कांबळे यांनी दिली.