बारामती/ जळोची -बारामती तालुक्यात 13 ग्रामपंचायत निवडणुकीसाठी सरपंचपदांसाठी 36 तर 127 सदस्य पदासाठी 291 उमेदवार रिंगणात आहेत. या गावांत चुरशीने मतदान होणार आहे. आता प्रचाराचा एक दिवस शिल्लक आहे. त्यामुळे आरोप- प्रत्यारोपाच्या तोफा चांगल्याच तापल्या आहेत. (दि.18) सकाळी 7:30 ते सायंकाळी 5.30 वाजेपर्यंत 13 ग्रामपंचायतीत एकूण 66 मतदान केंद्रावर मतदान होणार आहे. निवडणूक प्रशासन यंत्रणा सज्ज झाली आहे.
13 ग्रामपंचायतीत सरपंचपदासाठी 36 तर 127 सदस्य पदासाठी 291 उमेदवार रिंगणात आहेत. वाणेवाडी ग्रामपंचायतीत 4, सोरटेवाडीतील 3, सोनकसवाडी, मोरगाव व गडदरवाडी येथील प्रत्येकी 1 असे एकूण 10 सदस्य पदाचे उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत. मोरगाव, वागळवाडी, पणदरे, मुरुम, वाणेवाडी, गडदरवाडी, सोरटेवाडी, कुरणेवाडी, सोनकसवाडी, काऱ्हाटी, लोणी भापकर, मासाळवाडी, पळसी ग्रामपंचायतीमध्ये सरपंच आणि सदस्य पदांसाठी मतदान होणार आहे.
दरम्यान, ग्रामपंचायत निवडणूक शांततेत पार पाडावी, असे आवाहन प्राधिकृत अधिकारी तथा तहसीलदार विजय पाटील यांनी केले आहे. निवडणूक प्रक्रिया यशस्वीपणे राबवण्यासाठी 462 कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली आहे. मतदान प्रक्रिया पार पाडल्यानंतर सर्व सीलबंद मतपेट्या तहसील कार्यालयातील हॉलमध्ये पोलीस बंदोबस्तात ठेवणार आहेत. प्रशासकीय भवनातील बैठक सभागृहात दि.20 रोजी सकाळी 10 पासून मतमोजणीस सुरुवात होईल, अशी माहिती तहसीलदार पाटील यांनी दिली आहे.
आचारसंहितेचे पालन करण्यात यावे. उमेदवारांनी कोणत्याही प्रकारचे मतदारांना प्रलोभन दाखवू नये. मतदान प्रक्रिया शांततेत आणि सुरळित पार पाडण्यासाठी प्रत्येक केंद्रावर सुरक्षा व्यवस्था तैनात केली आहे. मतदान केंद्रावर कायदा व सुव्यवस्थेचे पालन करावे, असे आवाहनही त्यांनी केले आहे.
दरम्यान, शुक्रवारी (दि. 16) सायंकाळी प्रचार समाप्त होणार आहे. त्यानंतर स्थानिक नेत्यांचा छुपा प्रचार आणि धनशक्तीचा वापर मोठ्या प्रमाणात होण्याची शक्यता आहे. ग्रामपंचायत निवडणुकीत राजकीय वातावरण तापले असून बाहेरगावी असलेले मतदान आणण्याकडे दोन्ही गटांकडून प्रयत्न सुरू आहेत.
प्रचाराच्या तोफा आज थंडावणार
बारामती तालुक्यात 13 ग्रामपंचायत निवडणुकीसाठी वातावरण चांगलेच तापले होते. आरोप- प्रत्यारोपाच्या फैरी चांगल्या झडल्या होत्या. गावात अस्तित्व टिकविण्यासाठी स्थानिक नेत्यांनी चांगलीच कंबर कसली होती. शुक्रवार (दि.16) सायंकाळी प्रचाराच्या तोफा थंडावणार आहेत. त्यानंतर छुप्या पद्धतीने प्रचाराची रणनीती आखली जात आहे. त्यामुळे पडद्याआड हालचाली गतीमान झाल्या आहेत.