पुणे – राज्य शासन व सावित्रिबाई फुले पुणे विद्यापीठाकडून दुष्काळग्रस्त भागातील विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क माफ केले जाणार आहे. मात्र, शहरातील काही नामांकित महाविद्यालयांकडून विद्यार्थ्यांचे शुल्क माफ करण्यास टाळाटाळ होत आहे. विद्यार्थ्यांना उडवाउडवीची उत्तरे दिली जात आहेत, अशा महाविद्यालयांवर कारवाई करण्याची मागणी होत आहे.
परीक्षा शुल्क माफ करण्याबाबतचे परिपत्रक राज्य शासन व विद्यापीठाने काढले आहे. परंतु शहरातील नामांकित महाविद्यालये विद्यार्थ्यांचे शुल्क माफ करीत नसल्याचे स्टूडंट हेल्पींग हँडसचे अध्यक्ष कुलदीप आंबेकर यांनी सांगितले. अशा महाविद्यालयांची यादीच त्यांनी परीक्षा विभागास निदर्शनास आणून दिली.
परंतु, शुल्क माफीचे कोणतेच परिपत्रक आमच्याकडे आलेले नाही, खूल्या प्रवर्गातील विद्यार्थ्याना परीक्षा शुल्क माफ नाही, तुम्ही परीक्षा शुल्क भरा नंतर आम्ही परत देवू, शिष्यवृत्ती घेत असाल तर परीक्षा शूल्क मिळणार नाही, तुमचे गाव, तालुका दुष्काळग्रस्त भागात नाही, अशा प्रकारची कारणे महाविद्यालयांकडून विद्यार्थ्यांना सांगितली जात आहेत.
राज्यातील ४० दुष्काळी तसेच १०२१ महसूल मंडळांमध्ये दुष्काळसदृश्य स्थिती घोषित करुन सवलती लागू करण्याबाबतचे परीपत्रक राज्य सरकारने काढले होते. मात्र, त्याची अंमलबजावणी होत नाही. शासनाने निर्णय घेतला असला तरी दुष्काळग्रस्त भागातील विद्यार्थ्याचे परीक्षा शुल्क माफ ही योजना फक्त कागदपत्रीच आहे. त्यांची अमंलबजावणी न करणाऱ्या महाविद्यालयांवर कारवाई करावी, अशी मागणी विद्यार्थ्यांकडून होत आहे.