पुणे – येरवड्यातील बालसुधारगृहातील भिंतीला शिडी लावून चार मुले पसार झाली. एका गंभीर गुन्ह्यात या मुलांना तीन महिन्यांपूर्वी ताब्यात घेण्यात आले होते. याबाबत पंडित जवाहरलाल नेहरू उद्योग केंद्रातील कर्मचारी सुमंत जाधव (वय 31) यांनी येरवडा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
येथील बालसुधारगृहात गंभीर गुन्ह्यात सामील असलेल्या अल्पवयीन मुलांना बालन्याय मंडळाच्या आदेशाने ठेवण्यात येते. येथे अल्पवयीन मुलांच्या दोन गटांत किरकोळ कारणावरुन वाद झाले होते. यामध्ये नऊ अल्पवयीन मुलांनी दोघांना मारहाण केली. यामुळे बालसुधारगृहाच्या आवारात गोंधळ उडाला. नऊ मुलांविरुद्ध धमकावणे, गोंधळ घातल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तर, गोंधळाचा फायदा घेऊन चार अल्पवयीन मुलांनी आवरात पडलेली शिडी उचलली. बालसुधारगृहातील भिंतीला शिडी लावून चार अल्पवयीन मुले पसार झाली. या मुलांचा शोध सुरू पोलीस उपनिरीक्षक विशाल पाटील यांच्या नेतृत्वात केला जात आहे.