पुणे – महापालिकेकडून मरणासन्न अवस्थेत असलेल्या मुळा-मुठा नद्यांच्या पुनरूज्जीवनासाठी जायका प्रकल्प राबविण्यात येत आहे. या प्रकल्पा अंतर्गत शहरात ११ ठिकाणी सांडपाणी शुध्दीकरण केंद्र उभारली जाणार आहेत. मात्र, त्या सोबतच आता या सांडपाणी केंद्रातून निघणार्या गाळावर प्रक्रिया करून त्यापासून शेतीसाठी खतनिर्मिती केली जाणार आहे. त्यासाठी इटली देशातून मशीन मागवण्यात येणार आहे.
दरम्यान या मशीनची पाहणी करण्यासाठी महापालिका अतिरिक्त आयुक्त आणि काही अधिकारी इटलीला जाणार आहेत. महापालिकेकडून शहरात निर्माण होणारे १०० टक्के सांडपाणी थेट नदीत न सोडता त्यावर प्रक्रिया करून नदीत सोडले जाणार आहे. त्यासाठी जपानमधील जायका कंपनीच्या माध्यमातून ११ सांडपाणी केंद्र उभारली जात असून १० केंद्राची प्रत्यक्ष कामेही सुरू झालेली आहेत.
या प्रकल्पासाठी सुमारे १२०० कोटींचा खर्च अपेक्षित असून केंद्र शासन ८८५ कोटींचा निधी देणार आहे. त्यानुसार पाणी शुद्ध करून नदीत सोडले जाणार आहे. दरम्यान पाणी शुद्ध करताना प्रक्रिया केल्यानंतर जो गाळ शिल्लक राहणार आहे. त्यापासून महापालिका खत तयार करणार आहे. त्यासाठी ही मशिनरी वापरली जाणार आहे.
कृषी महाविद्यालयाच्या जागेचा तिढा सुटेना
महापालिकेकडून प्रस्तावित करण्यात आलेल्या सांडपाणी प्रकल्पांमध्ये एक जागा महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या ताब्यात आहे. या जागेसाठी राज्य शासनाकडे झालेल्या उच्चस्तरीय बैठकीत राज्याच्या नगरविकास सचिवांनी महापालिकेस ही जागा हस्तांतरित करण्याच्या सूचना कृषी महाविद्यालयास दिल्या आहेत. मात्र, त्यांच्याकडून अद्यापही ही जागा देण्यात आलेली नाही. त्यामुळे, या केंद्राचे काम रखडलेले असून याबाबत केंद्र शासनाने नाराजीही व्यक्त केली आहे. महापालिकेकडून त्याबाबत सातत्याने पाठपुरावा केला जात असला तरी महाविद्यालय जागा देण्यास तयार नसल्याचे चित्र आहे.