हडपसर : पुणे महापालिकेत समाविष्ट 34 गावांसह हडपसर, महंमदवाडी, खराडी, वडगावशेरी, खडकवासला, सिंहगड रोड अशी पुर्व हवेलीची स्वतंत्र महापालिका करण्याची मागणी भाजपचे पुणे जिल्हा उपाध्यक्ष राहुल शेवाळे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे . याबाबत उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी सकारात्मकता दर्शवली असल्याचे शेवाळे यांनी सांगितले.
नुकतीच राज्यसरकारने फुरसुंगी व उरुळी देवाची ही दोन गावे महापालिकेतून वगळली असून या गावांची नगरपालिका करण्याचे आदेश राज्य सरकारने दिले आहेत. यापूर्वी ऑक्टोंबर २०१७ ला अकरा गावांचा व जून २०२१ ला उर्वरित तेवीस गावांचा समावेश पुणे महापालिकेत करण्यात आला.दरम्यान समावेश झालेल्या गावात नागरी सुविधा पुरविण्यात महापालिका पूर्णपणे अपयशी ठरली. मात्र, या गावांमधून अवाजवी कर आकारून करोडो रुपये गोळा करण्यात आले आहेत. त्यामुळे सातत्याने या गावातील नागरिकांची महापालिके सोबत संघर्षाची भूमिका राहिली असून प्रचंड नाराजी या ठिकाणी पाहायला मिळत आहे.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी सकारात्मक चर्चा
लोकसंख्या व क्षेत्रफळाचां विचार करता राज्यातील सर्वात मोठी मनपा झाली आहे. तुलनेत सदस्य संख्या खूपच कमी आहे. पुणे मनपा वर वाढता ताण पाहता पूर्व भागाची नवीन महापालिका करण्यात यावी, अशी आग्रही मागणी आपण केली आहे.उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भेटून तसे निवेदन दिले आहे.त्यांनीही याविषयी अधिक माहिती घेवून योग्य निर्णय घेण्यात येईल असे सांगून या विषयासाठी सकारात्मकता दर्शविली आहे.
– राहुल शेवाळे(उपाध्यक्ष,पुणे जिल्हा भाजपा)
यापूर्वी ही १९९७ मध्ये पुणे महापालिकेत ३६ गावे समाविष्ट करण्यात आली होती. त्यावेळीही यातील काही गावे पुन्हा वगळली व पुन्हा ३४ गावांचा समावेश केला. आता नुकतीच राज्यसरकारने फुरसुंगी व उरुळी देवाची ही दोन गावे मनपा मधून वगळली असून या दोन गावांना नगरपालिकेचा दर्जा देण्याची घोषणा केली आहे. चौतीस गावांपैकी दोन गावे वगळल्याने सध्या इतरही गावांमध्ये वातावरण तापले असून आमच्याही गावांचा समावेश नगरपालिकेत करा किंवा महानगरपालिकेतून वगळावीत अशी मागणी जोर धरू लागली आहे. यासाठी प्रत्येक गावात ग्रामसभा आयोजित करण्यात येत आहेत.
याबाबत असे वाटते की, पुणे मनपामध्ये समाविष्ट चौतिस गावे व यापूर्वी मनपा मध्ये असलेली हडपसर, महंमदवाडी, खराडी, वडगावशेरी, खडकवासला, सिंहगड रोड ही गावे व पूर्व हवेलीतील काही गावे एकत्र करून पूर्व भागाची नवीन महापालिका स्थापन केल्यास पुणे मनपाचा ताण कमी होऊन या गावांचा नियोजनपूर्वक विकास साधला जाईल. असे शेवाळे यांनी या निवेदनात म्हटले आहे.