पुणे – शहरात गुरुवारी पाणी बंद ठेवल्यानंतर पेठांमधील नागरिकांना पाण्यासाठी वणवण फिरण्याची वेळ आली आहे. पावसामुळे घरांसमोर तळी साचलेली असली, तरी नळातून कमी वेळ आणि तेदेखील अपुऱ्या दाबाने पाणी येत आहे. त्यामुळे “समान पाणी पुरवठ्याची स्वप्न दाखवा, पण आधी किमान प्यायला तरी पाणी द्या,’ अशा शब्दांत या भागांतील नागरिक संताप व्यक्त करत आहेत.
मनपा पाणीपुरवठा विभागाकडे तक्रारी केल्यानंतर पाहणीसाठी आलेले कर्मचारीच “तुमच्या जलवाहिन्या जुन्या आहेत. त्यातून पाणीच येणार नाही. त्यामुळे तुम्ही पाण्यासाठी मोटार लावा,’ असा सल्ला देत आहेत. त्यामुळे नागरिकही हतबल झाले आहेत. बुधवार पेठ, सोमवार पेठ, भोरी आळी, रविवार पेठ, शुक्रवार पेठ, गुरूवार पेठ, मंगळवार पेठ कसबा पेठेच्या काही भागांत पाण्याची समस्या दिवसेंदिवस गंभीर होत आहे.
याबाबत बुधवार पेठेतील एका कुटुंबाने दिलेल्या माहितीनुसार, आमच्यासह वाड्यात 4 भाडेकरू आहेत. आमच्या घरात मी आणि माझी मुलगी राहते. घरात तीनशे लिटर क्षमतेची पाणीटाकी आहे. मात्र, तब्बल दीड तास मोटार चालवावी लागते, तरीही टाकी भरत नाही. त्यामुळे पाण्यापेक्षा विजेचे बिलच वाढले आहे. आम्ही पालिकेकडे तक्रार केली. मात्र, लाइन जुन्या आहेत. त्या बदलाव्या लागतील. पण, त्या कधी आणि कोण बदलणार? याचे काही उत्तर कर्मचारी देत नाहीत. उलट तुमची मोटार छोटी आहे. त्यामुळे जास्त क्षमतेची मोटार लावा असे सांगत आहेत. एकुणच महापालिका प्रशासन वाढीव काम लावून नागरिकांची लूट करण्याच्या प्रयत्नात दिसते.
मीच हेलपाटे घालून थकलो
शुक्रवार पेठेत राहणाऱ्या एका महापालिकेच्या कर्मचाऱ्याचीही पाण्यासाठी वणवण सुरू आहे. याबाबत बोलताना हा कर्मचारी म्हणाला, “मी शुक्रवार पेठेत आई-वडील, पत्नी आणि मुलासह राहतो. सकाळी पत्नी आणि मला ऑफिसला जायचे असते तर मुलाला शाळेत जायचे असते. मात्र, पाणीच वेळेत येत नाही. वेळापत्रच्या आधी नाहीतर उशिरा पाणी येते. अनेकदा पाणी बंद असल्यानंतर दोन-दोन दिवस पाणी अतिशय थोडे येते. याबाबत आपण स्वत: पाणी पुरवठा विभागात तक्रार केली. त्यावर पाहणीही झाली. मात्र, पुढे काहीच झालेले नाही.
शहरात पाणी बंद ठेवल्यानंतर दुसऱ्या दिवशी पाण्याची अडचण निर्माण होते. या भागातील लाइन जुन्या आहेत. या भागासह शहरातही परिणाम होतो. पण आम्ही त्याबाबत उपाययोजना करत आहोत. जलवाहिन्या जुन्या असून, अनेक लाइन माहितही नाहीत. त्यामुळे कमी दाबाच्या तक्रारी येत आहेत. त्यावर उपाय शोधण्याचे काम सुरू आहे, असे पाणीपुरवठा विभाग प्रमुख अनिरूद्ध पावसकर म्हणाले.