अपघातानंतर प्रशासन जाग येणार का?
निमोणे : 2010 साली खासदार निधीतून तयार झालेल्या शिंदोडी-गुनाट रस्त्याची सध्या मोठया प्रमाणात दुरावस्था झाली असून 14 वर्षात छोट्या-मोठया खड्यांचा अपवाद वगळता या रस्त्याची दुरुस्ती झालेली नाही. त्यामुळे सुमारे पाच किमी अंतराच्या रस्त्यावर प्रचंड मोठया प्रमाणात खड्डे पडले असून सार्वजनिक बांधकाम खात्याला कधी जाग येणार, असा संतप्त सवाल वाहनचालक विचारत आहेत.
2010 साली शिंदोडी येथील सामाजिक कार्यकर्ते आणि पत्रकार कै. लक्ष्मणराव फडके यांनी जिल्हा परिषद तसेच तत्कालीन खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्याकडे पाठपुरावा करुन शिंदोडी-गुनाट या रस्त्यासाठी निधी मिळावा यासाठी प्रयत्न केले होते.
खासदार निधीतून हा सुमारे पाच किमी रस्ता करण्यात आला होता. परंतु त्यानंतर 14 वर्षात काही अपवाद वगळता या रस्त्याकडे स्थानिक लोकप्रतिनिधी तसेच प्रशासन यांचे दुर्लक्ष झाले आहे.
सध्या रस्त्यावर मोठया प्रमाणात खड्डे पडले असून वाहनचालकांना वाहन चालविताना मोठी कसरत करावी लागत असल्याने गंभीर अपघात होण्याची शक्यता आहे. रस्त्याची तात्पुरती डागडुजी न करता कायमस्वरुपी रस्त्यावरील खड्डे बुजविण्यात यावे, अशी मागणी शिंदोडी तसेच गुनाट ग्रामस्थांनी केली आहे.