पुरंदरमध्ये पिकावर डाऊनी, भुरी, करपा रोगांचा प्रादूर्भाव
बाजारभावही अस्थिर
तालुक्यात 1213.60 हेक्टर क्षेत्रावर लागवड
निखिल जगताप
बेलसर – पुरंदर तालुक्यामध्ये खरीप हंगामात भुईमूग, वाटाणा, सोयाबीन, भातासोबतच टोमॅटो पिकाचीही लागवड मोठ्या प्रमाणात केली जाते. पुरंदरमध्ये वीर, परिंचे, बेलसर, पारगाव मेमाणे तर इतर भागातही टोमॅटो पिकाचे भरघोस उत्पन्न घेतले जाते. तालुक्यामध्ये सलग पडणाऱ्या अतिपावसामुळे टोमॅटो पिकावर डाऊनी, भुरी, करपा रोगांचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात होऊ लागल्याने टोमॅटो पीक जमीनदोस्त होत आहे.
चालू वर्षी पुरंदर तालुक्यामध्ये 1213.60 हेक्टर क्षेत्रावर टोमॅटो पिकाची लागवड झाल्याची नोंद कृषी विभागात आहे तर मागील वर्षीच्या तुलनेत चालू वर्षी टोमॅटो पिकाची लागवड कमी झाली आहे. मागील वर्षी बाजार भावाने अक्षरश: शेतकऱ्यांना रडवले होते तर मागील वर्षी अनेक रोग यामध्ये प्लॅस्टिक व रोग तिरंगा वायरस त्यासोबतच इतर रोगांचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात दिसून आला होता त्याच अनुषंगाने चालू वर्षीही अति पावसामुळे मागील वर्षी पेक्षा वेगळे या रोगांचा प्रादुर्भाव दिसून येत असल्याने शेतकरी हैराण झाला आहे.
टोमॅटो पिकाची लागवड बेलसर परिसरात साधारणतः 50 ते 60 टक्के झाली आहे त्यामध्ये उशिरा पण सलग पावसामुळे ओढे, नद्या, नाल्यांना पाणी आले असले तरी शेतामध्ये उभे असलेले पीक जमीनदोस्त होऊ लागले आहे तर बाजार भाव कमी-जास्त होत आहेत तरी सद्यस्थितीला जागेवरील खरेदी 200 ते 300 रुपयांचे आसपास झालेली पाहावयास मिळते.
टोमॅटो पीक हे अधिक पैसा देणारे पीक म्हणून त्याकडे पाहिले जाते तर चालू वर्षी समाधानकारक बाजारभाव मिळेल या आशेने शेतकऱ्यांनी संकटांशी सामना करत टोमॅटो पीक चांगल्या प्रकारे आणले आहे; परंतु मागील आठ दिवसांमध्ये झालेल्या अधिक पावसामुळे टोमॅटोवर मोठ्या प्रमाणात बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव झालेला आहे बॅक्टेरीयल ब्लाईट, भूरी, करपा, बॅक्टेरियल करपा, फळ काळे पडणे, तिरंगा अशा अनेक रोगांनी टोमॅटो पीक वेढले आहे, त्यामुळे शेतकऱ्यांना अधिक औषध फवारण्या कराव्या लागत आहेत.
बुरशीनाशक फवारणी श्रेयस्कर
डाऊनी रोगासाठी चांगल्या प्रकारची बुरशीनाशके यांचा वापर करण्याचा सल्ला कृषी अभ्यासक देतात. डाऊनी मिल्ड्यूचा प्रसार आणि प्रभाव थांबवण्यासाठी क्लोरोथॅलोनिल, मॅन्कोझेब, अझॉक्सिस्ट्रोबीन आणि कॉपर युक्त बुरशीनाशकांचा वापर महत्त्वाचा आहे. प्रामुख्याने पावसाच्या संततधारेमध्ये चांगल्या गुणवत्तापूर्ण स्टिकर चा वापर करावा तर आंतरप्रवाही बुरशीनाशकांचा सोबत स्पर्शजन्य बुरशीनाशकाचे ही संयुक्तिक मिश्रण पिकावर फवारल्याने रिझल्ट चांगला व लवकर मिळतो.
नुकसानभरपाईची शेतकऱ्यांची मागणी
पुरंदर तालुक्यामध्ये सलग पडणाऱ्या पावसामुळे दिवे, गराडे, वीर, भिवडी, बेलसर, नाझरे, परिंचे, वाघापूर, नीरा, वाल्हा परिसरातील नुकसान झालेल्या शेतीचे पंचनामे करून नुकसानभरपाई मिळावी अशी मागणी शेतकरी मोठ्या प्रमाणात करीत आहेत.
ऑगस्टमध्ये 141.4 टक्के पाऊस
पुरंदर तालुक्यामध्ये ऑगस्टमध्ये जवळपास 141.4 टक्के पावसाने हजेरी लावली आहे. अपेक्षित 91 मिलिमीटर सरासरी पावसापेक्षा 128.7 मिलिमीटर पावसाची नोंद तालुक्यात झाली आहे. त्यामुळे या पडणाऱ्या अति पावसामुळे तालुक्यातील शेती जीवन विस्कळीत झाले आहे. तर खरीप हंगामातील पिकांना मोठा फटका यामुळे बसला आहे.