40 टक्के निर्यातशुल्क लावल्याने खासदार कोल्हे यांची निर्णयावर टीका
शिरूर – कांदा निर्यातबंदी उठवली पण 40 टक्के निर्यातशुल्क आकारुन शेतक-याच्या ताटात माती कालविल्याचे काम केंद्र सरकारने केलं, अशा शब्दांत महाविकास आघाडीचे उमेदवार खासदार डॉ. अमोल कोल्हेंनी केंद्र सरकारच्या कांदा निर्यातबंदी उठवण्याच्या निर्णयावर हल्लाबोल केलाय.
महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे उमेदवार खासदार डॉ. अमोल कोल्हे आज शिरुर तालुक्याच्या दौर्यावर होते. त्यावेळी त्यांच्यासोबत आमदार अशोक पवार, सुरेश भोर, शेखर पाचुंदकर, दामु घोडे, अरुणा घोडे, स्वप्नील गायकवाड, रामदादा गावडे, गणेश जामदार आदी उपस्थित होते.
डॉ. कोल्हे म्हणाले की, कांदा निर्यातबंदी उठवली असली तरी हा समाधानकारक निर्णय नसून एका हाताने द्यायचे अन दुस-या हाताने काढून घ्यायचे असे काम सुरु आहे. लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर कांदा निर्यातबंदी उठविण्यासाठी अमोल कोल्हेंनी केंद्र सरकारला चांगलेच धारेवर धरले.
संविधानाच्या रक्षणासाठी मतदान करा
अनेक वर्षांपासून पाण्याचा प्रश्न प्रलंबित असल्याने जुन्नर तालुक्यातील आणेपठार पाणी संघर्ष समितीच्या वतीने नळवणे, शिंदेवाडी, पेमदरा या गावात मतदानावर बहिष्कार टाकण्यात आला होता. याबाबत खासदार डॉ. कोल्हे म्हणाले, पठार भागातील सर्व गावांना पाणी मिळालं पाहिजे हा आपल्या सर्वांचाच प्रयत्न आहे; परंतु त्यासाठी मतदानावर बहिष्कार न टाकता आपण सगळे मिळून लोकशाही मार्गाने तोडगा काढू असे आवाहन मी समितीला केले. सार्वत्रिक निवडणूक हा आपल्या लोकशाहीचा सर्वांत मोठा उत्सव आहे.
मतदान हा आपल्या संविधानाने, लोकशाहीने आपल्याला दिलेला अधिकार आहे. देशातील सद्यस्थिती पाहता या संविधानाला व लोकशाहीला बाधा निर्माण होण्याचा धोका आहे. या संविधानाचे, लोकशाहीचे व पर्यायाने आपल्या हक्कांचे रक्षण करण्यासाठी सर्वांनी आवर्जून मतदान करावे अशी विनंती केली. माझ्या विनंतीस सकारात्मक प्रतिसाद देत समितीच्या वतीने आगामी लोकसभा निवडणुकीत भरभरून मतदान करण्याचे सर्वांना आवाहन करण्यात आले.