चाकण – चाकण शहरासाठी पाणीपुरवठा योजना राबविणे या 169.76 कोटींच्या महत्वकांक्षी प्रकल्पाचे 4 डिसेंबर रोजी मंत्रालयामध्ये नगरविकास विभागाच्या उच्चस्तरीय तांत्रिक समितीसमोर सादरीकरण होऊन प्रकल्पास अंतिम मंजुरी मिळाली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांची या प्रस्तावावर सही घेऊन येत्या आठवड्याभरात मंजुरीचा शासन निर्णय पारित होणार असल्याची माहिती शिवसेना उपनेते, शिरूर लोकसभेचे माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी दिली.
माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील हे सन 2020 पासून या प्रकल्पाचा सातत्यपूर्ण पाठपुरावा करीत आले आहेत. त्यांच्या पाठपुराव्याला यश येऊन डिसेंबर 2021 मध्ये 65 कोटींच्या पाणीपुरवठा योजनेस मंजुरी मिळाली होती; मात्र ही योजना मंजूर करताना लोकसंख्येचा निकष सदोष असल्याचे लक्षात आल्याने व भविष्यात चाकणकरांना अपुर्या पाणीपुरवठ्याला सामोरे जावे लागू नये, ही बाब डोळ्यांसमोर ठेवून आढळराव पाटील यांनी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे मुख्य अभियंता राजेंद्र रहाणे यांचे दालनात बैठक आयोजित केली होती.
या बैठकीत चाकण शहराचे सन 2050 पर्यंतचे पाणी नियोजन लक्षात घेऊन दीर्घकाळ उपयुक्त राहील अशी पूरक पाणी योजना राबविण्याच्या त्यांनी सूचना दिल्या होत्या. त्यानुसार चाकण शहराच्या 1 लाख 20 हजार लोकसंख्येला पूरक प्रतिमाणसी 135 लिटर प्रमाणे पाणीपुरवठा करणार्या योजनेचा आराखडा अद्यावत करण्यात आला.
आढळराव पाटील म्हणाले, नगरपरिषद प्रशासन संचालनालयाच्या मंत्रालयीन प्रकल्प सादरीकरणाच्या यादीत चाकण प्रकल्पाचे नाव समाविष्ट नव्हते. त्यामुळे मी काही आवश्यक कागदपत्रांची संबंधित अधिकार्यांकडून पूर्तता करून घेतली. नगरविकास विभागाच्या वरिष्ठ अधिकार्यांशी सतत संपर्कात राहून प्रकल्प सादरीकरणाच्या यादीत चाकणचे नाव समाविष्ट करून घेतले. अखेर सादरीकरण होऊन या प्रकल्पास उच्चस्तरीय तांत्रिक समितीची अंतिम मंजुरी मिळाली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची अहवालावर सही होऊन येत्या आठवडाभरात याबाबत शासन निर्णय होईल.
चाकण पाणी योजनेसाठी माझा सन 2020 पासून पाठपुरावा सुरु आहे. योजना मार्गी लावताना अनेक अडचणी निर्माण झाल्या. यामध्ये प्रामुख्याने धरणाच्या पाण्याचे आरक्षण मंजूर करणे, उद्योग मंत्रालयाअंतर्गत असणार्या पश्चिम महाराष्ट्र विकास महामंडळाची 1.92 हेक्टर जागा जलशुद्धीकरण केंद्राच्या उभारणीसाठी मिळवून देणे आदीकरिता पाठपुरावा केला. मंजुरीसाठी मोठा वेळ लागत असल्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या दालनात वरिष्ठ अधिकार्यांसोबत दोन वेळा बैठका घेऊन विषय तडीस नेला.
पश्चिम महाराष्ट्र विकास महामंडळ, जिल्हाधिकारी, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण यांच्याकडे शिवसेनेचे जिल्हाप्रमुख भगवान पोखरकर, जिल्हा सहाय्यक अशोक भुजबळ, स्व. मा. आमदार सुरेशभाऊ प्रतिष्ठानचे अध्यक्ष नितीन गोरे, अक्षय जाधव आदि शिवसेना पदाधिकार्यांसमवेत अनेक बैठका घेतल्या.
भामा आसखेडचे पाणी आरक्षित
169 कोटींच्या या महत्वपूर्ण पाणी योजनेसाठी भामा आसखेड धरणातून 10 दशलक्ष घनमीटर इतके पाणी आरक्षित ठेवले जाणार आहे. योजनेद्वारे पूर्ण शहरात पाइपलाइनद्वारे वितरण व्यवस्था होऊन ठिकठिकाणी आवश्यकतेनुसार पाण्याच्या टाक्या, जलशुद्धीकरण केंद्र, जॅकवेल उभारण्यात येणार आहे. चाकण शहराच्या 1 लाख 20 हजार लोकसंख्येला गृहित धरून सन 2050 पर्यंत पाण्याचे नियोजन केले जाणार आहे. जलशुद्धीकरण केंद्र उभारणीसाठी पश्चिम महाराष्ट्र विकास महामंडळाची 1.92 हेक्टर जागा चाकण नगरपरिषदेस हस्तांतरित केली जाणार आहे.