करोनाकाळात पटले जोडीदाराचे महत्त्व
पुणे – वादामुळे कौटुंबिक न्यायालयात पोहोचलेल्या तब्बल 364 प्रकरणांत नव्याने संसार सुरू करण्यासाठी अर्ज करण्यात आले आहेत. मागील पाच वर्षांचा विचार केल्यास याचे प्रमाण सर्वाधिक आहे. करोनामुळे वाद वाढले. त्यानंतर करोना काळात जोडीदाराचे महत्त्व पटल्याने पती किंवा पत्नीने पुन्हा नांदायला यावे, यासाठी कौटुंबिक न्यायालयात दाखल होणाऱ्या दाव्यांचे प्रमाण वाढले आहे.
पती-पत्नीत वाद झालेला असेल व त्यातील कोणताही एक साथीदार दुसऱ्या साथीदारापासून विभक्त झालेला असेल तर त्या साथीदाराने पुन्हा नांदायला यावे, याबाबतचे आदेश न्यायालयाने द्यावे यासाठी हिंदू विवाह कायद्याच्या कलम 9 आणि स्पेशल मॅरेज अँक्टच्या कलम 22 नुसार हा अर्ज दाखल करता येतो. यावर दोन्ही बाजूंचे म्हणणे ऐकून घेत न्यायालय योग्य तो निर्णय देत असते.
करोनाकाळ अवघड होता. ज्यांना जवळची माणसं नाहीत, त्यांना या काळात त्रास झाला. त्यामुळे माणसाला माणसाची किंमत समजली. सतत घरी असल्याने या काळात माणसाला मानसिक आधाराची अधिक गरज होती. ज्यांच्याजवळ कुटुंबातील व्यक्ती आहेत. त्यांना हा आधार मिळाला. या काळात आपल्या साथीदाराचे महत्त्व अधिक प्रकर्षाने जाणवले. त्यातून आपल्या साथीदाराने परत नांदायला यावे यासाठीचे अर्ज करण्याचे प्रमाण वाढले आहे.
– ऍड. अमृता तनय देशमुख, कौटुंबिक न्यायालयात प्रॅक्टिस करणाऱ्या वकील