भीमाशंकर साखर कारखाना येथे उपोषण, ठिय्या आंदोलन
पारगाव शिंगवे – ऊस उत्पादक शेतकऱ्यांना अंतिम हप्त्यासह 3 हजार 350 ते 3 हजार 400 रुपये दर द्यावा, या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने भीमाशंकर सहकारी साखर कारखाना दत्तात्रयनगर पारगाव (ता.आंबेगाव) येथील स्थळावर बेमुदत उपोषण व ठिय्या आंदोलन करण्यात आले आहे.
यावेळी बोलताना स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष प्रभाकर बांगर म्हणाले, चालू वर्षी 2023-24 च्या गाळप हंगामातील एफआरपी 2 हजार 700 रुपये रक्कम भीमाशंकर साखर कारखान्याने आपल्या खात्यात जमा केली आहे. विघ्नहर साखर कारखान्याने देखील 2 हजार 750 रुपये एफआरपी रक्कम जमा केली आहे. 22 रुपये एफआरपी बाकी आहे. आता भीमाशंकर कारखान्याने अंतिम हप्त्यासह विनाकपात सोमेश्वर व माळेगाव साखर कारखान्याप्रमाणे रक्कम 3 हजार 350 रुपये ते 3 हजार 400 रुपये प्रति टन इतका दर आपल्या ऊस उत्पादकाना मिळावा, यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने आंदोलन सुरू केले आहे.
शेतकऱ्यांच्या कष्टाचे पैसे मिळालेच पाहिजे यासाठी आम्ही गप्प बसणार नाही अंतिम हप्त्यासह 3 हजार 350 ते 3 हजार 400 रुपये दर घेतल्याशिवाय मागे हटणार नसल्याची भूमिका बांगर यांनी घेतली असून भीमाशंकर आणि विघ्नहर साखर कारखान्यांबरोबर पराग व व्यंकटेशकृपा या खासगी कारखान्यांनी देखील हा दर दिला पाहिजे, अशी मागणी प्रभाकर बांगर यांनी केली आहे. यावेळी वनाजी बांगर, तुकाराम गावडे, पांडुरंग निकम, प्रकाश कोळेकर, संतोष पवार, पंढरीनाथ गावडे,नामदेव भोकरकर, संतोष गावडे, विलास एरंडे, गणेश दौंड, किसन दौंड, संदीप जांभळे, नवनाथ पोखरकर, महादू पोखरकर, अंकुश बांगर, सोपान सावंत,गोरक्ष भोर यांसह शेतकरी उपोषण स्थळी उपस्थित होते.
भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याने नेहमीच उस उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा देण्याचे काम करत आहे. कारखान्याचे संस्थापक आणि सहकारमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या माध्यमातून वार्षिक सर्वसाधारण सभेत ऊस दराबाबत घोषणा केली जाते. कारखान्याची वार्षिक सभा लवकरच होणार असून, ऊसदराबाबत वार्षिक सभेत घोषणा केली जाईल. भीमाशंकर सहकारी साखर कारखाना नेहमीच शेतकऱ्यांचे हित जपत आला आहे. कारखान्याकडे राजकारण म्हणून पाहू नये,अशी विनंती आहे.
– बाळासाहेब बेंडे,
अध्यक्ष, भीमाशंकर साखर कारखाना