निमसाखरकरांची हाक : पळसमंडळला जोडणारा बंधारा धोकादायक
निमसाखर – मामा जरा इकडे पण लक्ष द्या, असे म्हणण्याची वेळ दत्तात्रय भरणे आमदार असलेल्या इंदापूर तालुका आणि पालकमंत्री असलेल्या सोलापूर जिल्ह्यातील नागरिकांवर आली आहे. इंदापूर तालुक्यातील निमसाखर तर सोलापूर जिल्ह्याच्या माळशिरस तालुक्यातील पळसमंडळला जोडणारा बंधारा खचला तर निमसाखरमधील वीरवस्तीपासून पुढे बंधाऱ्यापर्यंतचा रस्ता “असून अडचण, नसून खोळंबा’ अशीच झाली आहे.
निमसाखर व पळसमंडळला जोडणाऱ्या या बंधाऱ्याचा भरावा मोठ्या प्रमाणात वाहून गेला आहे. तर या बंधाऱ्याचा पायाही मोठ्या प्रमाणात खचला आहे. त्यामुळे या बंधाऱ्यावरुन वाहतूक करणे धोकादायक होत आहे. या बंधाऱ्याच्या भरावाची तातपुरती कामे होतात; पुन्हा हा भराव वाहून जातो. या संदर्भात इंदापूर तालुक्यातील नीरा नदीवरील बंधारे भरावासाठी मोठा निधी दिल्याची माहिती येतेय.
भराव्याचे काम होईल पण कायम गळतीचा आणि दुर्लक्षित बंधारा म्हणजे निमसाखरचा बंधारा अशीच काही ओळख निर्माण झाली आहे. सध्या इंदापूर तालुक्याचे आमदार, राज्यमंत्री व सोलापूर जिल्ह्यातचे पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांच्याकडे सार्वजनिक बांधकाम व वन विभागाचे मंत्री पद आहे. त्यामुळे भरणे यांच्या कार्यकाळात या रस्त्याचे काम व बंधाऱ्याचे नुतनीकरण होणे नागरिकांना अपेक्षित आहे. या संदर्भात राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांच्याशी संपर्क साधला तो होऊ शकला नाही.
प्रत्यक्ष येऊन पाहाच
सोलापूर जिल्ह्यातील पळसमंडळ, चव्हाणवाडी, बांगार्डे, तर इंदापूर व बारामती तालुक्यातील निमसाखर, कळंब, बावडा, भवानीनगर, बारामती, इंदापूर आदी परिसरातील विद्यार्थी, शेतकरी, व्यावसायिक, व्यापारी व नोकरदार यांची या बंधाऱ्यावरून व रस्त्यावरून मोठ्या प्रमाणात वाहतूक होत असते; मात्र पाऊस झाल्यानंतर या रस्त्याने जाणे येणे अतिशय कठीण होते. यामुळे निमसाखर (वीरवस्ती) पासून ते बंधारा रस्त्याची अवस्था काय आहे, ती प्रत्यक्ष पहा म्हणजे रस्त्याची काय स्थिती आहे ते समजेल! अशी प्रतिक्रिया लोकांमधून येत आहे.