भामा आसखेड, चासकमान पुनर्वसन अंतर्गत शेत जमिनीवरील शिक्क्यांचा प्रश्न
राजगुरूनगर : काळूस येथे मराठा आरक्षण आंदोलनास पाठिंबा व भामा आसखेड, चासकमान पुनर्वसन अंतर्गत शेत जमिनीवरील शिक्क्यांचा प्रश्न यासंदर्भात बेमुदत साखळी उपोषण सुरू झाले आहे.
मनोज जरांगे यांचे नेतृत्वाखाली सुरू असलेले मराठा आरक्षण आंदोलनास पाठिंबा देऊन आरक्षण मिळावे, यासाठी काळूस येथील मराठा शेतकरी बांधव आणि रयत क्रांती संघटना यांच्या वतीने रविवारपासून (दि. 29) बेमुदत साखळी उपोषण आंदोलन सुरू झाले आहे. गेली 40 वर्षांपासून काळूस व पंचक्रोशीतील शेतकऱ्यांच्या शेतजमिनीवर भामा-आसखेड, चासकमान पुनर्वसन अंतर्गत टाकलेले शिक्के काढून शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करण्याच्या प्रमुख मागणीसाठी व इतर मागण्यांसाठी खेड तालुका रयत क्रांती संघटना आणि काळूसमधील मराठा शेतकरी बांधवांच्या वतीने हे बेमुदत साखळी आंदोलन सुरू केले आहे.
शेतकरी बांधवांनी 40 वर्षांपासून प्रदीर्घ प्रलंबित भामा आसखेड, चासकमान पुनर्वसन अंतर्गत शेत जमिनीवर टाकलेले शिक्के व मराठा आरक्षण यासंदर्भात तीव्र भावना व्यक्त केल्या. मागण्या मान्य होईपर्यंत साखळी उपोषण सुरू ठेवून टप्प्याटप्प्याने आंदोलनाची तीव्रता वाढवण्याचे देखील सुतोवाच शेतकऱ्यांनी त्यांच्या मनोगत व्यक्त केले.
यावेळी खेड तालुका रयत क्रांती संघटनेचे अध्यक्ष सुभाष पवळे, कार्याध्यक्ष विठ्ठलशेठ आरगडे, विश्वास पोटवडे, नामदेव वाटेकर, नितीन दौंडकर, नवनाथ आरगडे, गणेश पवळे, सुरेश कौंटकर, बारकू जाचक, गोरक्ष कदम, नामदेव वाटेकर, मिनीनाथ साळुंखे, भरतभाऊ आरगडे,. गजाननराव गांडेकर, प्रा डॉ. बाळासाहेब माशेरे, मयूर दौंडकर यांच्यासह मोठ्या संख्येने शेतकरी व मराठा बांधव उपस्थित होते.
परिसर घोषणांनी दुमदुमला
आंदोलनस्थळी एक मराठा लाख मराठा.., कोण म्हणतो देणार नाही घेतल्याशिवाय राहणार नाही.., आरक्षण आमच्या हक्काचे नाही कुणाच्या बापाचे.., शेतकऱ्यांच्या शेतजमिनीवरील पुनर्वसनाचे शिक्के निघालेच पाहिजे.., कोरा करा कोरा करा, सातबारा आमचा कोरा करा.., छत्रपती शिवाजी महाराज की जय.. यांसारख्या घोषणांनी परिसर दुमदुमून गेला आहे.