मंचर – स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष प्रभाकर बांगर हे शेतकऱ्याच्या प्रश्नांसाठी नेहमी आंदोलन करत असतात. त्यांच्यावर झालेल्या हल्ल्याचा प्रकार निंदनीय असून, हल्लेखोरांना तात्काळ अटक करा, अशी मागणी भीमाशंकर कारखान्याचे माजी अध्यक्ष देवदत्त निकम यांनी पोलीस प्रशासनाकडे केली आहे.
शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष प्रभाकर बांगर यांच्यावर सोमवारी (दि. 2) एकलहरे येथे झालेल्या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर मंचर येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात मंगळवारी (दि. 3) शिवसेना, राष्ट्रवादी कॉंग्रेस शरद पवार गट, किसान सभा, आम आदमी पार्टी पक्षाच्या वतीने निषेध सभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी गणेश खानदेशे, वैभव टेमकर, माउली ढोमे इत्यादी मान्यवर उपस्थित होते.
देवदत्त निकम म्हणाले, आंबेगाव, जुन्नर, खेड या तालुक्यातील शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी प्रभाकर बांगर हे नेहमी आंदोलन करत असतात. कांद्याचा, दुधाचा, उसाचा, कृषी उत्पन्न बाजार समिती येथील हमाल, मापाडी, यांचा कुठलाही प्रश्न असल्यास ते नेहमी सक्रिय असतात. शिवनेरीवरील मुख्यमंत्र्यांचे भाषण रोखण्याचे काम देखील बांगर यांनी केले होते; मात्र त्यांच्यावर झालेला हल्ल्याचा प्रकार हा चुकीचा असून मंचर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक बलवंत मांडगे यांनी कर्तव्यामध्ये कसूर न करता आरोपींना चार ते पाच तासांत अटक करावी, अशी मागणी देवदत्त निकम यांनी केली आहे.
स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते प्रकाश तात्या बालवडकर यांनी सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील यांच्यावर टीका करत प्रभाकर बांगरसारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्यावर हल्ला करणाऱ्या राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांवर कारवाई करावी, अशी मागणी केली आहे. यावेळी एड राजू बेंडे पाटील, वनाजी बांगर, सचिन बांगर, अशोकराव काळे, राजू घोडे, बाळासाहेब बाणखेले, अमोल वाघमारे, अमरसिह कदम, अजित चव्हाण इत्यादीची भाषणे झाली. स्वप्नील बांगर यांनी आभार मानले.
मंचर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक बळवंत मांडगे म्हणाले प्रभाकर बांगर यांनी दिलेल्या फिर्यादी नुसार योग्य तपास करून कारवाई केली जाईल,
प्रभाकर बांगर हे शेतकऱ्यांच्या न्याय हक्कासाठी उपोषणास बसले होते. कारखान्यावर सात दिवस उपोषणादरम्यान त्यांना त्रास देण्यात आला व त्याच रागातून हा हल्ला त्यांच्यावर करण्यात आला आहे. पोलिसांनी आरोपींना तात्काळ अटक करावी. अन्यथा आंबेगाव तालुक्यात कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास त्याला पोलीस प्रशासन जबाबदार राहील.
-प्रकाश तात्या बालवडकर, स्वाभिमानी शेतकरी संघटना