दौंडमधील बळीराजा चिंतेत : माती, मनुष्य, जलचर पशुपक्ष्यांचे आरोग्य बिघडले
यवत – दौंडच्या शेतकर्यांना शेतीच्या पाण्यासाठी कालव्याच्या माध्यमातून तलाव भरेपर्यंत पाण्यावर अवलंबुन राहावे लागत असत त्यावर पर्याय म्हणून बेबी कालव्यातून पुण्यामधील सांडपाणी दौंडच्या शेतीला देण्याचा निर्णय झाला. यामधून दौंडच्या शेतकर्याना सांडपाणी शेतासाठी मिळू लागले. मात्र यातील हिरव्यागार दुर्गंधीयुक्त रासायनिक सांडपाण्यातून शेतीसोबत जनावरे, जलचर, पशुपक्षी यांचे देखील आरोग्य धोक्यात आले आहे.
सध्या दौंड तालुक्यात बेबी कालव्याद्वारे शेतीला महानगरपालिकेचे रासायनिक सांडपाणी दिले जात आहे. शेतीला पाण्याची नितांत गरज आहे. मात्र दूषित पाणी दिल्यामुळे मातीचे आरोग्य धोक्यात आले आहे. तसेच कुपनलिका व विहिरीमध्ये दूषित पाणी आल्यामुळे फिल्टर करून वापरण्यात येणारे पाणी सुद्धा सध्या मानवी आरोग्यास धोक्याचे ठरू लागले आहे.
शेतीला पाण्याची गरज आहे. मात्र मातीचे आरोग्य बिघडले तर भविष्यात क्षारयुक्त मातीमध्ये पिकांची उगवण क्षमता घटणार आहे. या पाण्यात मानवी आरोग्यास घातक असे सूक्ष्म घन खनिजे आढळून येत आहेत. जमिनीची पाण्याचा निचरा होण्याची क्षमता कमी होत आहे. त्यामुळे नापिकतेकडे वाटचाल होईल. उसासारख्या पिकाला या पाण्याचा थोडाफार फायदा होत असला तरी काही पालेभाज्यांना हे पाणी दिले तर त्या लगेचच जळून जातात. या पाण्याला हिरवागार रासायनिक रंग आहे. वाहत असलेल्या प्रवाहात प्रचंड फेस तयार होतो.
पाण्यातून कायम फेसाळलेला तवंग वाहत असतो. यातूनच हे समजते की हे पाणी शेती व मानवी आरोग्यास घातक आहे. हे पाणी सोडण्यापूर्वी पुणे महानगरपालिकेने चांगल्या पद्धतीने फिल्टरेशन करणे अपेक्षित आहे. मात्र शेतीला पाणी जाणार असल्याने याकडे दुर्लक्ष केले जात आहे. भविष्यात पालेभाज्या फळभाज्या यांना या प्रकारचे पाणी वापरले तर निश्चितच कर्करोगाचा सामना करावा लागेल असे तज्ज्ञांचे मत आहे. परिसरातील अनेक फिल्टर प्लांट आहेत. नजीकच्याच कुपनलिकेतून किंवा विहिरीचे पाणी वापरून पाण्याचे शुद्धीकरण केले जाते. या पाण्यात थोडा बहुत अंश दूषित पाण्याचा असणारच आहे. त्यामुळे देखील मानवी आरोग्यावर याचे घातक परिणाम भविष्यात होणार आहेत. हे पाणी येऊन गेल्यानंतर डासांची पैदास मोठ्या प्रमाणात होते. जनावरांना, मानवाला व जलचरांना याचा प्रचंड धोका आहे. हे पाणी शेतकर्यांचे आजची गरज भागवत आहे मात्र भविष्यात कर्करोगासारख्या महाभयंकर रोगांना सामोरे जावे लागणार आहे.
पालकमंत्र्यांनी लक्ष द्यावे
पुणे महानगरपालिकेतील प्रत्येक ठिकाणी वेगवेगळे फिल्टर बसवले आहेत. जल नियोजन समिती व पालकमंत्र्यांनी याकडे लक्ष देऊन या पाण्याचे शुद्धीकरण उच्च कोटीचे करण्याकडे लक्ष द्यावे. शेती व मानवी आरोग्यास योग्य असल्यासच ते कालव्याद्वारे पुढे पाठवावे, अशी मागणी जोर धरीत आले.
पुणे महानगरपालिकेने पाणी सोडताना चांगल्या पद्धतीने फिल्टर करावे. सध्या फिल्टर करत असताना त्याच्या गुणवत्ते कडे दुर्लक्ष केले जात आहे. दूषित पाणी माती, मनुष्य, पशुपक्षी यांचे आरोग्य धोक्यात आणत आहे. संबंधितांनी याकडे काळजीपूर्वक व जबाबदारीने लक्ष देऊन भविष्यातील धोका टाळावा.
– नीळकंठ शितोळे, ज्येष्ठ शेती अभ्यासक, गलांडवाडी