सातारा – लोकसभा निवडणुकीत खासदार उदयनराजे भोसले यांनी मिळवलेला विजय हा महायुतीतील जिल्ह्यातील सर्व आमदार, ज्येष्ठ नेते यांच्या मार्गदर्शनाखाली भारतीय जनता पक्ष व मित्र पक्षांचे सर्व जिल्हाध्यक्ष, सर्व विधानसभा प्रमुख, सर्व विस्तारक, बूथ प्रमुख, विधानसभा समन्वयक व विशेषतः सर्व पक्षांच्या महिला आघाडी पदाधिकारी यांनी घेतलेल्या कष्टाचे फलित आहे. म्हणून छत्रपतींच्या राजधानीत प्रथमच जिल्ह्याच्या इतिहासात भाजपचा उमेदवार म्हणून उदयनराजे भोसले यांनी देदीप्यमान विजय मिळविला, असे मत भाजपचे सातारा लोकसभा संयोजक सुनील काटकर यांनी व्यक्त केले.
काटकर म्हणाले, या निवडणुकीला सामोरे जात असताना वरील सर्व पदाधिकाऱ्यांसोबत महत्त्वाची भूमिका बजावत असणारे सर्व शहरातील माजी नगराध्यक्ष, माजी उपनगराध्यक्ष, माजी नगरसेवक तसेच ग्रामीण भागातील सर्व आजी-माजी सभापती, जिल्हा परिषद सदस्य व पंचायत समिती सदस्य, जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायत सरपंच व सदस्य यांच्यासह मतदारांना बूथपर्यंत पोहचवण्याची जबाबदारी पार पडणारे महायुती व खासदार उदयनराजेंवर प्रेम करणारे सर्वसामान्य मावळे यांच्या उस्फूर्त कामगिरीच्या जोरावर हा ऐतिहासिक विजय साजरा करण्याची संधी सातारकरांना मिळाली. तसेच वेगवेगळ्या आघाड्यांवर काम करताना सैनिक, शिक्षक, वकील, डॉक्टर, कामगार, उद्योग, दलित संघटना यांसारख्या विविध संघटनांनी दिलेले योगदान महत्त्वाचे ठरले, असे त्यांनी सांगितले.
याशिवाय पोस्टल मतदानाद्वारे सैनिकांच्या जिल्ह्यातील सैनिकांनी आपली जबाबदारी चोख बजावत खासदार उदयनराजेंना भरघोस असे मतदान केले त्या सैनिकाप्रति कृतज्ञता व्यक्त करून या निवडणुकीत हस्ते परहस्ते व ज्ञात अज्ञात नागरिकांकडून झालेले सहकार्य हे देखील तेवढ्याच तोला मोलाच असून खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांचे वतीने मी आपणा सर्वांचे ऋणनिर्देश व्यक्त करतो.