कऱ्हा नदीवर श्रींना सोमवती स्नान
जेजुरी – महाराष्ट्राचे कुलदैवत तथा खंडेरायाची राजधानी असलेल्या जेजुरीत सोमवारी (दि. 17 सोमवती) यात्रा भरली होती. भंडाऱ्याची मुक्त उधळण करित भाविकांनी येळकोट येळकोट जयमल्हार असा खंडोबाचा जयघोष केला. सोनपिवळ्या भंडाऱ्याच्या उधळणीने जेजुरीचा गड सोनेरी झाला होता. “सदानंदाचा येळकोट’च्या जयघोषात पालखी सोहळा रंगला. कुलधर्म-कुलाचार, कऱ्हास्नान, देवदर्शन आदी धार्मिक विधींसाठी सुमारे चार लाख भाविकांनी यात्रेसाठी गर्दी केली होती.गेल्या काही वर्षातील ही सर्वात मोठी गर्दी ठरली.
अमावास्या रविवारी (दि. 16) सुरू झाल्याने दर्शनासाठी रविवारी रात्रीच भाविक मोठ्या संख्येने जेजुरीत येत होते. सोमवारी पहाटेपासून मोठी गर्दी झाली होती. दिवसभर रांगा लावून भाविक खंडोबाचे दर्शन घेत होते. सोमवारी दुपारी एक वाजता गडावर प्रमुख वतनदार इनामदार पेशव्यांनी इशारा देताच पालखी सोहळ्याने गडकोटातून प्रस्थान ठेवले. यावेळी खोमणेपाटील व माळवदकर पाटील आदी मानकरी उपस्थित होते.
मंदिराची प्रदक्षिणा सुरू असताना भाविकांनी येळकोट येळकोट जय मल्हार, सदानंदाचा येळकोट असा भंडारा उधळत जयघोष केला. देवसंस्थानचे मुख्य विश्वस्त पोपटराव खोमणे, विश्वस्त अभिजित देवकाते, अनिल सौंदडे, मंगेश घोणे, ऍड. विश्वास पानसे, पांडुरंग थोरवे, डॉ. राजेंद्र खेडेकर, व्यवस्थापक राजेंद्र जगताप, पर्यवेक्षक गणेश डीखळे, बाळा खोमणे, व्यवस्थापक सतीश घाडगे ग्रामस्थ मंडळाचे अध्यक्ष जालींदर खोमणे आदी यावेळी उपस्थित होते.
यंदा भाविकांची प्रचंड गर्दी असल्याने पालखी सोहळ्याला वाट काढताना खांदेकऱ्यांना कसरत करावी लागत होती. गर्दीमुळे पालखी शहराबाहेर पडण्यासाठी उशीर लागलार त्यामुळे स्नानाचा कार्यक्रमही साडेपाच वाजण्याच्या सुमारास झाला. महाद्वारातून पालखी जेजुरी शहरात आल्यानंतर नागरिकांनी जागोजागी भंडारा उधळून व रांगोळया काढून पालखीचे स्वागत केले. पालखी नदीवर जात असताना पावसाची रिमझिम सुरू झाली.त्यामुळे खांदेकऱ्यांचा उत्साह दुणावला होता. सायंकाळी कऱ्हा नदीवर सोमवती स्नान झाले.कऱ्हेच्या पाण्याने व दहीदुधाने उत्सवमूर्ती स्नान घालण्यात आले.
भाविकांनी सोमवती स्नानाची पर्वणी साधली. यावेळी नदीवर भाविकांची मोठी गर्दी झाली होती. त्यानंतर पालखी परतीचा प्रवास सुरू झाला. ठिकठिकाणी पालखीचे रांगोळ्या काढून स्वागत करण्यात येत होते. सायंकाळी पालखी जानाई मंदिरात आणण्यात आली.तिथे स्थानिक नागरीकांनी दर्शनासाठी गर्दी केली होती. त्यानंतर रात्री उशीरा पालखी गडावर आणण्यात आली. रोजमारा वाटून पालखी सोहळ्याची सांगता झाली.
पाऊस नसल्याने बळीराजाची गर्दी
सध्या पाऊस नसल्याने परिसरातील शेतकरी वर्ग मोठ्या संख्येने यात्रेत सहभागी झाला होता. पालखी सोहळयासाठी लागणाऱ्या सर्व सुविधा देवसंस्थानच्यावतीने पुरविण्यात आल्याचे यावेळी मुख्य विश्वस्त पोपटराव खोमणे यांनी सांगितले.
खांदेकरी किरकोळ जखमी
गर्दीतून वाट काढताना तीन खांदेकरी जखमी पालखी गडावरून खाली येताना मोठ्या गर्दीमुळे खांदेकऱ्यांना कसरत करावी लागत होती. गर्दीतून वाट काढताना जानुबाई मंदिराच्या जवळतीन खांदेकरी किरकोळ जखमी झाले. त्यांना रुग्णालयात पाठविण्यात आले. गर्दीमुळे पालखी नदीवर पोहोचण्यास काहीसा उशीर झाल्याचे पुजारी गणेश आगलावे यांनी सांगितले.