राहुल गणगे
पुणे – ऐन दसरा, दीपावलीच्या तोंडावर बाजारपेठेत सर्वच डाळींचे भाव गगनाला भिडले आहेत. हेच भाव 15 दिवसांपूर्वी घटले होते. सध्या बाजारपेठेत तूरडाळांची प्रतिकिलो 120 रुपयांनी विक्री केली जात आहे. मूग, उडीद आणि चणा आदी डाळींच्या दरात 10 रुपयांची वाढ झाली आहे. पावसामुळे शेतकऱ्यांच्या तूर, मूग, चवळी, वाल, मटकी, हुलगा आदी पिकांचे नुकसान झाले आहे. त्यामुळे डागी मूग, चवळी, सोयाबीन बाजारात येत आहे.
55 ते 60 रुपये भाव मिळण्याऐवजी कवडीमोल 12 ते 15 रुपये किलो भाव मिळत आहे. सोयाबीनला प्रति क्विंटल 3300 रुपये भाव मिळत आहे. महागाईच्या वणव्यात शेतकरी होरपळला जात आहे. शेतकऱ्यांना हमीभाव नसल्याने दरवाढीचा फायदाच मिळत नाही. त्यात शेतकरी आणि ग्राहकांना फटका सोसावा लागत आहे.
सणासुदीचे दिवस जवळ ठेपलेले असताना बाजार समितीमधील धान्य मार्केटमध्ये डाळींच्या भावात मोठ्या प्रमाणावर वाढ झालेली पाहायला मिळत आहे. दसरा, दिवाळीसारखे मोठे सण तोंडावर असताना आठ दिवसांत तुरडाळीच्या दरात 25 रुपयांची वाढ झाली आहे. 15 दिवसांआधी डाळींचे भाव 80-86 रुपये प्रतिकिलो होते.
सध्या तूरडाळ 120 रुपये प्रतिकिलोने विकली जात आहे. महाराष्ट्रामध्ये लातूर, अकोला, गुजरातहून तूर डाळीची मोठी आवक होत असते; परंतु यंदा कडधान्ये पावसामुळे वाया गेली आहेत. सरकार दरवेळी हमीभाव जाहीर करत आहे. याचा लाभ कोणत्याही शेतकऱ्यांना मिळत नाही.
डाळींचा भाव 100 पेक्षा कमी असणे अपेक्षित आहे. काही मोठे व्यापारी मुद्दाम डाळींची आवक कमी करून दरात वाढ करत आहे. डाळींच्या साठेबाजीमुळे ही भाव वाढ झाली आहे. तूर डाळीचे भाव वाढण्याची आता वेळ नाही, असं अनेक व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे. सरकारने यावर नियंत्रण ठेवण्याची गरज आहे.
आमचे दात आमच्याच घशात
सध्या बाजारात आवक कमी असलेल्या कडधान्याच्या बाजारभावात मोठी वाढ झाली आहे. शेतातील तूर, मूग, हरभरा, मटकी अशी विविध कडधान्य पिके शेतकऱ्यांकडून 30 रुपयांपासून 80 रुपये दरापर्यंत घेतली जातात. त्याचीच डाळ आम्हाला 120 रुपये दुप्पट दराने खरेदी करावी लागत आहे. या प्रक्रियेकडे सरकारचे नियंत्रण असायला पाहिजे. नाहीतर आमचेच दात आमच्याच घशात गेल्याशिवाय राहणार नाहीत.
यंदा ऐन मूग तोडणीत पावसाने हजेरी लावली. सततच्या पावसामुळे मुगीच्या शेंगा झाडाला असतानाच कुजल्या. हाती आलेला घास पावसाने हिरावला. चालू वर्षी सुरवातीला मुबलक पाऊस झाल्यामुळे कडधान्य व मूग पेरणी वेळेत झाली. भरघोस पीक येऊन उत्पन्न चांगले मिळेल, अशी आशा होती; परंतु पेरणीचा खर्चदेखील वसूल झाला नाही.
-किसनराव गोरडे, शेतकरी वाघाळे.