नवी दिल्ली – केंद्रीय मंत्री रामविलास पासवान यांच्या निधनामुळे बिहार विधानसभा निवडणुकीत काही अनिश्चिततेचे रंग भरले गेले आहेत. त्यामुळे बिहारमध्ये पासवान फॅक्टरचे महत्व वाढल्याचे चित्र आहे.
बिहारमधील आघाडीचे दलित नेते असणारे पासवान यांचे निधन ऐन निवडणूक काळात झाले. त्यामुळे त्यांनी स्थापन केलेल्या लोक जनशक्ती पक्षाबाबत (लोजप) मतदार काय निर्णय घेणार याविषयीची उत्सुकता वाढली आहे.
सवान यांना मानणाऱ्या दलित मतदारांची संख्या बिहारमध्ये लक्षणीय आहे. आता ते लोजपच्या पाठिशी कायम राहणार की वेगळा पर्याय निवडणार, हे निवडणूक निकालातून स्पष्ट होईल. लोजपची धुरा पासवान यांचे पुत्र चिराग सांभाळत आहेत.
चिराग यांनी याआधीच स्वबळावर निवडणूक लढवण्याचे जाहीर केले आहे. आता वडिलांच्या निधनामुळे चिराग यांना सहानुभूतीचा लाभ होणार की मतदार पिता-पुत्राबाबत वेगळी मोजपट्टी वापरणार हेही दिसून येणार आहे.
चिराग यांच्याशी तुलना होईल असा तरूण दलित नेता सध्या तरी बिहारमध्ये दृष्टीपथात नाही. त्या बाबीचा लाभ त्यांना उठवता येणार का, असा मुद्दाही पुढे आला आहे.